माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात एकनाथ शिंदेंना हिंदुत्व कसे आठवले नाही. शिंदेंची तेवढी हिंमत नाही तर भाजपचा प्लॅनिंग आहे. काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती बरोबर
गेले तेव्हा भाजपचे हिंदुत्व कुठे गेले होते. शिवसेनेची करंगळी धरून महाराष्ट्रात स्थिरावलेली भाजप शिवसेना फोडत आहे. लोक धनुष्य नाही मनुष्य पाहणार आहेत, असा टोला शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी भाजपला लगावला.अहमदनगरमधील माऊली सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी
सुभाष वानखेडे बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार विजय औटी, उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम, युवा सेना कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे, माजी आमदार उल्हास पाटील, सहसंपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे आदी उपस्थित होते.
सुभाष वानखेडे म्हणाले भाजपने उद्धव ठाकरेंची तब्बेत ठिक नसताना शिवसेनेची तोडफोड केली. शिवसेना उद्धवस्त करून भाजपला स्वतःला सक्षम व्हायचे आहे. महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेने करंगळी धरून स्थिरावले. तिच भाजप शिवसेने
विरोधात षडयंत्र करत आहे. भाजपचा मुखवटा वेगळा आहे. गौतम अडाणीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पैसे दिले. देशात महागाई वाढवली. हा विकास आहे का? देशात जे रस्ते दिसत आहेत ते बीओटी तत्त्वावरील आहेत. लोक सुडाने पेटून उठले आहेत. ते निवडणुकांची वाट पाहत आहेत.
आपल्याला बदला घ्यायचा आहे. पुलवामा हल्ल्यातील ३५० किलो आरडीएक्स कोणी आणले हे केंद्रीय तपास यंत्रणांना अजूनही सापडले नाही. मात्र कोणाकडे किती रुपये आहे. काय व्यवहार आहे, याची चौकशी करायला केंद्रीय यंत्रणा धावत येतात, असा टोलाही त्यांंनी लगावला.