माय महाराष्ट्र न्यूज:यंदा देशात मोहरीची विक्रमी लागवड झाली. त्यामुळे यंदा उत्पादनात विक्रमी वाढ होईल, असा केंद्र सरकारचा सुरूवातीचा अंदाज होता. परंतु प्रतिकूल हवामानाचा
फटका पिकाला बसला आहे. आधी कडक थंडी आणि आता उष्णतेची लाट यामुळे मोहरीचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.यंदा १२० ते १२५ लाख टन मोहरी उत्पादन होईल, असा अंदाज होता; परंतु
हवामानाने साथ दिली नाही, असे सॉल्वन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन अर्थात एसईएचे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी सांगितले. गेल्या वर्षी १०५ लाख टन मोहरी उत्पादन झालं होतं.
यंदाही तीच पातळी कायम राहील, असे मेहता म्हणाले. मोहरी उत्पादन कमी होणार असल्याने केंद्र सरकारला पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढवावी लागेल.दरम्यान या घडामोडींमुळे
सोयातेलाची मागणी वाढेल. त्याचा फायदा सोयाबीनला होईल. सोयाबीनमधील दरवाढीला भक्कम आधार मिळेल, असे बाजारअभ्यासकांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून एल-निनो चर्चेत आला आहे. अमेरिकी हवामान संस्था यंदाच्या मॉन्सून
हंगामात ‘एल-निनो’चा प्रभाव राहण्याचा इशारा देत आहेत. भारतातील हवामान संस्थांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.एल निनो म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा
दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. त्यासोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून जातात. त्यामुळे पश्चिमेकडील भागात दुष्काळ पडतो तर पूर्वेकडील भागात अतिवृष्टी होते.
थोडक्यात यंदा एल-निनो हा घटक सक्रिय राहिला तर भारत आणि आशिया खंडातील इतर देशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. तर अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना इत्यादी भागांत अधिक पाऊस होईल. ‘एल-निनो’चा अंदाज खरा ठरला तर खरीप
पिकांच्या उत्पादनावर परिणाम होईल.प्रामुख्याने सोयाबीन व इतर तेलबिया, कापूस, मका यांना फटका बसेल. तसेच पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे रब्बी पिकांवरही परिणाम होऊ शकतो. तसेच फळे व भाजीपाला पिकांवरही उत्पादनघटीचे सावट असेल.
पुढचे दोन-तीन महिने ‘एल-निनो’ची चर्चा कायम राहणार आहे. त्याचा बाजारावर लगेच होणारा परिणाम म्हणजे सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या दरात वाढ होऊ शकते. कारण पुढच्या हंगामात उत्पादन कमी राहणार असे चित्र निर्माण झाले तर त्याचा बाजारावर लगेच परिणाम होईल.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या शेतमालाचे दर वाढतील. अर्थात एल-निनो खरंच येईल का, त्याचा नेमका किती परिणाम होईल, याचा अंदाज आताच बांधणं घाईचं ठरेल. मे महिन्याच्या शेवटी नेमकं चित्र स्पष्ट होईल, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं.