नेवासा/सुखदेव फुलारी
श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे.कृष्ण हे संरक्षण, करुणा, माया आणि प्रेमाचे प्रतीक असून कंस हे सत्ता ,कपट आणि शक्तीच्या अहंकाराचे प्रतीक आहे. कपटवृत्ती व अहंकाराचा नाश करण्यासाठीच श्रीकृष्ण आवतार असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज
यांनी केले.
नेवासा तालुक्यातील वाकडी येथे
महंत भास्करगिरीजी महाराज यांचे प्रेरणेने सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त श्री विजयी हनुमान मंदिरात आयोजीत श्रीपद भागवत कथेचे ५वे पुष्प गुंफताना महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज बोलत होते.कथे पूर्वी त्यांनी गावातील गोशाळेला भेट दिली.
कथेसाठी महाराजांचे पिताश्री दिनकर महाराज मते, महंत सोमेश्वर भारती महाराज,बाळु महाराज कानडे, शुभम महाराज बनकर,शिवाजी महाराज बिरदवड़े, गणपत महाराज आहेर,गणेशानंद महाराज,अशोक महाराज बोरूडे, अंकुशराव काळे, विलासराव लोखंडे,जलमित्र सुखदेव फुलारी, राहुल कोळसे, मंगेश निकम,श्री विजयी हनुमान गोशाळेचे स्वयंसेवक, ग्रामस्थ,भाविक उपस्थित होते.
स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज पुढे म्हणाले,भागवत कथा हा असा ग्रंथ आहे ज्यात संपूर्ण पुराणांचा सार आहे. म्हणूनच त्याला वेदांचे फळ म्हटले जाते. भागवत कथेबद्दल सर्वांना आदर आहे. जो कोणी ही कथा रोज ऐकेल त्याचे आत्मकल्याण होईल. प्रत्येक वेळी तुम्ही कथा ऐकाल तेव्हा तुम्हाला ती नवीन वाटेल.माणसाच्या जीवनात सेवेची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे. मग ती शिक्षकांची,पाहुण्यांची किंवा देवाची सेवा असो. हनुमानजींचे उदाहरण देताना महाराजांनी सांगितले की, श्रीरामजींची पूजा करताना हनुमानजी स्वतः पूजनीय झाले.हनुमानाच्या मंदिरात राम असेल किंवा नसेल, पण श्रीरामाच्या दरबारात हनुमान नक्कीच उपस्थित असतो, हे सेवेचे फळ आहे. श्रीमद भागवत ग्रंथ हृदयात उतरवावा.भगवंताचे नामस्मरण केले तर कल्याण होईल.
भागवत कथा ऐकण्यासाठी चांगले कार्य आपल्या हातून घडले असावे म्हणून तुम्ही या कथेला उपस्थित आहे . आपल्या जीवनात आपण भागवत कथा मधील प्रसंग आत्मसात केले पाहिजे.आपण भागवत कथा एकदा जरी श्रवण केली तर आपल्या मध्ये खूप मोठा बदल झालेला दिसून येईल.आपल्याला आलेले दुःखाबद्दल कोणाला दोष देऊ नका, हे आपल्या कर्माचे फळ आहे असे समजा. आपल्या हाताने जसे कर्म घडते तसेच आपल्याला त्याचे फळ मिळत असते.सर्वजण एका जीवाने राहा. कोरोना काळाने आपल्याला सर्व काही शिकवले आहे. आपल्या कुटुंबात प्रेम असू द्या. पैसा हाच सर्वस्वी नाही,प्रेम ही महत्वाचे आहे.
श्री विष्णु भगवान यांचे मत्स्य,कूर्म,वराह,नरसिंह,वामन ,
परशुराम,राम,कृष्ण,गौतम बुद्ध,कल्की या दहा आवतारा पैकी श्रीकृष्ण हा आठवा आवतार आहे.
महाराजांनी नरसिंह, मत्स्य, कूर्म, वामन व राम अवतार व कार्य प्रसंग वर्णन करून कथा श्रोत्याना मंत्रमुग्ध केले.श्रीकृष्ण जन्म प्रसंगी पुष्पवृष्टि करण्यात आली.
*अश्रु अनावर…*
रावणाने सीता मातेचे अपहरण केल्या नतंरचा व्याकुल झालेल्या श्रीराम प्रभुंना लंकेत अशोक वाटिकेत सीतामाता असल्याचा निरोप घेऊन आलेल्या हनुमंताला श्रीराम प्रभुंनी मिठी मारल्याचा प्रसंग सांगताना स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज कथा व्यासपीठावर ढसढसा रडले.त्यांच्या बरोबर उपस्थित महिला भाविकांना ही आपले अश्रु आवरता आले नाही.
*बुधवारी समारोप….*
वाकडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेचा समारोप उद्या बुधवार दि.८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे प्रमुख मंहत भास्करगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तनाने होणार आहे.