माय महाराष्ट्र न्यूज : भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्हयात दि ७ ते ९ मार्च, २०२३ या कालावधीमध्ये वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा
तसेच गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली असल्याने जिल्हयातील नागरीकांना पुढील प्रमाणे दक्षता घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या, लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे.
वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी
पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला
असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.नागरीकांनी वादळी वारे, वीज आणि गारपीटीपासून स्वत:सह
जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय
अहमदनगर येथील दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा,असे राजेंद्रकुमार पाटील निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी
अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.