माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कधी गोड बोलून गळा दाबतील यांना कळणार पण नाही, अशी टीका शिंदे गटाचे नेते तथा
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. तर आम्हाला 40 जणांना पाडण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि अजित पवारांनी फिल्डींग लावली असल्याने आम्ही वेगळा निर्णय घेतला, असेही त्यांनी म्हटले आहे.
आमदार शहाजीबापूंनी सांगोल्यात पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी हा दावा केला असून यावेळी त्यांनी शरद पवारांवरही टीकास्त्र डागले. पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील तसेच कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचा हळूवार प्लॅन सुरु होता. की, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना 10 ते 15 जागांपेक्षा जास्त जागा निवडून येऊ
द्यायच्या नाहीत. आणि त्याचवेळी दुर्दैवाने उद्धव ठाकरे हे करोना आणि आजारपणामुळे मंत्रालयात येत नव्हते.माझ्यासह बाहेर पडलेल्या 40 ही आमदारांना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून होणारा धोका लक्षात आला होता. तेव्हा आम्ही
बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेनेला पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आमच्या शिवसेनेचे नेतृत्व दिले. यामुळे शिवसेनेची वाढ होणार असून सर्व निवडणुकीत विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
शहाजीबापू पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. ते गेली 45 वर्षे माझे पालक होते. मात्र, त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी सोबत आलेल्या लोकांना आणि पक्षांना हळू हळू संपवले आहे. शिवसेनेला ते कधीही मोठे होऊ देणार नाही.
शिवसेनेच्या नेत्यांनी सर्वांत जास्त शिवसेनेवर टीका केली आहे. यामुळे शरद पवार कधी गोड बोलून गळा दाबतील हे सांगता येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.