माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या
बैठकीत शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपसोबत जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला जात आहे. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे.
पण राष्ट्रवादी कुणासोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. शरद पवार यांचा रोख अजित पवार
यांच्या दिशेने तर नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. संजय राऊत यांनी ‘सामना’तील आजच्या ‘रोखठोक’मधून हा दावा केला आहे.मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना
भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा
निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे.जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले. ईडीच्या दहशतीने लोकांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही.
राजकारणात राहून लोकांनी अमाप संपत्ती कमावली. ती टिकविण्यासाठी त्यांना सत्तेची कवचकुंडले हवीच असतात. घाऊक पक्षांतरे त्यातून होतात.पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, ‘आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात
गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत!’ शिंद्यांबरोबर गेलेल्या 11 आमदार व 6 खासदारांच्या फायली सध्या टेबलावरून कपाटात गेल्या आहेत. शिंदे गटाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या
आमदारांच्या अशा किती फायली कपाटात जातील ते पाहायचे.आज राज्याचे चित्र काय आहे? शिंदे सरकारचे मंत्री मंत्रालयात जात नाहीत. देवेंद्र फडणवीस ‘सागर’ बंगल्यावरून काम करतात. शिंदे यांच्या ताब्यात ‘वर्षा’सह तीन सरकारी बंगले आहेत.
शिंदे यांचे चिरंजीव प्रशासनात सरळ हुल्लडबाजी करतात. त्यामुळे मंत्रालयापासून सर्वत्र अस्वस्थता आहे. सरकार कोठे चालले आहे? ते मंत्रालयातच झोपले आहे.