माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या १,४३२ करोना रुग्णांची भर पडली आहे.
त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ५,९२६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्क्यांवर घसरलं आहे. सर्वाधिक ५२२ रुग्ण नगर शहरात आहेत. नगर ग्रामीण, राहाता, पारनेर व श्रीरामपूर या तालुक्यांतही रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे.
दुसरी लाट दीर्घकाळ रेंगाळलेल्या नगर जिल्ह्यात यावेळीही रुग्णसंख्या वाढतच आहे. सोमवारी एका दिवसात दीडपट रुग्णवाढ झाली आणि मंगळवारीही ही वाढ कायम राहिली आहे.
आणखी काही काळ रुग्ण वाढणार असल्याचा अंदाज आल्याने आता सर्व तालुक्यांतील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत या सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, जिल्ह्यातील करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम केलं पाहिजे. त्यासाठी दररोजच्या चाचण्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक वाढवली पाहिजे. दुसरा डोस घेण्यासाठी
पात्र असलेल्या मात्र लसीकरण न केलेल्या लोकांची संख्या काही तालुक्यांमध्ये जास्त आहे. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, अशा सूचनाही डॉ. भोसले यांनी केल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे म्हणाले की, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील रूग्ण पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. यासाठी कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्यावर भर देण्याची अवश्यकता आहे.