माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर पक्षाने आता राज्यातील ५ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे.
या मतदारसंघांत पक्षसंघटन वाढवण्याचं काम पक्षाने सोपवलं असून त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा यापूर्वी
अनेकदा झाल्या. मात्र अद्याप मंत्रिपद मिळालं नसलं तरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांप्रमाणे त्यांच्याकडे आता पक्षविस्ताराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.रोहित पवारांवर ज्या मतदारसंघांची
जबाबदारी सोपवण्यात आली आहे ते पाचही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघासोबत श्रीगोंदा, उस्मानाबाद, भूम-परांडा, करमाळा आणि पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पवार यांच्यावर सोपवली.
पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्यावर ही जबाबदारी सोपवली असून पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी
काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात
राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास रोहित पवार यांनी ट्वीट करून व्यक्त केला आहे.उस्मानाबाद आणि भूम-परांडा येथे शिवसेनेचे आमदार आहेत. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट झालेली आहे. पवारांचे निकवर्तीय माजी
मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या परिवाराने राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे पवार कुटुंबीयांना जिव्हारी लागले होते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने विविध कारणांमुळे महत्त्वाच्या असलेल्या मतदारसंघांची जबाबदारी रोहित पवार यांच्यावर सोपवली आहे.