माय महाराष्ट्र न्यूज : राहुल कोळसे:- सन २०२३ च्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने सर्व शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक व योग्य दरामध्ये बियाणे, खते व औषधे उपलब्ध व्हावीत, यादृष्टीने जिल्हास्तरावरून रँडम पध्दतीने निवड करण्यात आलेले कृषि सेवा केंद्रांचे दुसऱ्या तालुक्यातील भरारी पथकामार्फत तपासणी करून तपासणीअंती त्रुटी आढळल्यास
कडक कारवाई करण्यात येणार आहे. सर्व तालुकास्तरावर भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आलेली असून, यामध्ये तालुक्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांची पथकामार्फत पूर्ण तपासणी करणे, नमुने काढणे ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
विक्रेते, वितरक, उत्पादक कंपन्या यांचेशी संबंधित सर्व दस्तऐवज खरेदी-विक्री व्यवहार नोंदी, साठा पुस्तके, उगम प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे या भरारी पथकामार्फत तपासली जाणार आहेत. तसेच मुदतबाह्य औषधे, बियाणे, जादा दराने विक्री, खताची लिकिंग यामध्ये त्रुटी आढळल्यास तात्काळ कारवाई करणे, बोगस बियाणे, बनावट औषधे खते अनधिकृत बीटी कपाशी यामध्ये दोषी आढळल्यास संबंधित कृषि सेवा केंद्र चालकावर तसेच कंपनीवर कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना भरारी पथकांचे निरीक्षकांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेले आहेत.
शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड करण्यास घाई न करता शासनाने दिलेल्या सुचनेनुसार १ जून नंतरच कपाशी बियाणे खरेदी करावे व इतर पिकांचेबाबतीतही पोषक वातावरण तयार झाल्यानंतरच बियाणे खरेदी करून लागवड करावी. कृषि निविष्ठा खरेदी करताना पक्की बीले मुदतबाह्य तारीख, मूळ किंमत तसेच इतर महत्वाची माहितीची खात्री करूनच निविष्ठांची खरेदी करण्यात यावी. बोगस बियाणे, बनावट खते व औषधे जादा दराने विक्री, खताचे लिकिंग याबाबत काही तक्रार असल्यास तात्काळ कृषि विभागाशी संपर्क करावा असे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.