माय महाराष्ट्र न्यूज:वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतात निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळं नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाळा
चाळिशीच्याजवळ पोहोचला आहे. येत्या २ एप्रिलपर्यंत उन्हाचा पारा कायम राहणार असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.यंदा मार्च महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मार्च महिन्यात
२१ ते २४ मार्च आणि २९ ते २ एप्रिलपर्यंतच्या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवण्यात आल्या आहेत. बुधवारपासून राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होत आहे. मुंबई, कोकण वगळता
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात कमाल पारा चाळिशी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारीच मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या आसपास होते.
जळगाव, नाशिक जिल्ह्यात ३० मार्च, १ आणि २ एप्रिल रोजी उष्णतेची लाट तीव्र असेल. तर, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यात ३० व ३१ मार्च आणि १, २ एप्रिल अमरावती,
बुलडाणा, ३० आणि ३१ मार्च, चंद्रपूर जिल्ह्यात ३१ मार्च तर, नागपूर जिल्ह्यात ३० मार्च रोजी उष्णतेची लाट सर्वाधिक सक्रीय असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान वाढ अधिक जाणवू लागली आहे. मंगळवारी विदर्भ विभागात चंद्रपूरमध्ये ४३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
तर अकोला येथे ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. गडचिरोली वगळता इतर सर्वच केंद्रांवर पारा ४० अंशांच्या आसपास होता. मराठवाड्यातही परभणी आणि नांदेड या दोन्ही केंद्रांवर ४१ अंशांहून अधिक कमाल तापमान नोंदले गेले.