माय महाराष्ट्र न्यूज:देशात उन्हाची तीव्रता सुरुवातीपासूनच जाणवत आहे. काही भागात तापमानाने 45 अंशाचा पारा गाठला. वाढत्या तापमानाने जिवाची लाहीलाही होत असताना
एक दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून ही अपडेट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात सुमारे 2-3 अंश सेल्सिअसची
घसरण नोंदवण्यात आली आहे. परिणामी देशात येत्या 5 दिवसांत उष्णतेची लाट कमी होईल, असे हवामान खात्याने सांगत नागरिकांना दिलासा दिला आहे. सोबत एक इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.
अशात तुम्ही जर कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर हा इशारा जाणून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे.उत्तर-पश्चिम राजस्थान आणि दक्षिण हरियाणाच्या वेगळ्या
भागांशिवाय मंगळवारी देशभरात उष्णतेची लाट नव्हती. त्यामुळे देशातील कोणत्याही भागात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले नाही. भारतीय हवामानशास्त्र विभाग च्या म्हणण्यानुसार, राजस्थान,
पंजाब, दिल्ली आणि हरियाणाच्या कमाल तापमानात गेल्या 24 तासांत 2-4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे.हवामान खात्याने हिमाचल प्रदेशात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल, असे विभागाने सांगितले. दरम्यान, सिमल्यासह राज्यातील अनेक भागात पाऊस आणि गारपीट झाली, त्यामुळे तेथील तापमान खाली आले आहे.
विभागाने 4 मे रोजी चंबा, कांगडा, मंडी, सिरमौर, सोलन येथे गारपिटीसह जोरदार वाऱ्यांबाबत यलो अलर्ट जारी केला आहे.उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागात पुढील 5 दिवसांत उष्णतेची
लाट येण्याची शक्यता नाही, असा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, बुधवारपासून महाराष्ट्रातील कमाल तापमानात 2-4 अंश सेल्सिअसने वाढ होईल असे हवामान खात्याने संगितले आहे. तर देशाच्या
इतर भागात कोणताही विशेष बदल हवामानात होणार नाही. महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लात जोरात आहे. काही भागात तापमानाने 44 अंशाचा पारा गाठला आहे. त्यात कमाल तापमानात
2-4 अंश सेल्सिअसची वाढ होणार असल्याने चिंता वाढली आहे.