माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव आहे. रविवारी ( दि. 22 ) दुपारी 11 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची
नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत शीतलच्या माहेरील नातेवाईकांनी तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच तिच्या सासरच्या दारातच अंत्यसंस्कार करून आपला संताप व्यक्त केला.
निळवंडे येथील खंडोबा मंदिर शिवारात असलेल्या शेततळ्यात शितल सतीश केरे ( वय 32 वर्षे ) या विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढत
उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी मयत शितलचे सासरे संतू माधव केरे यांनी पोलिसांत खबर दिली. शितल सतीश केरे ही कपडे धुण्यासाठी
शेततळ्यावर गेले असता पाय घसरून शेततळ्याच्या पाण्यात पडून बुडून ती मयत झाल्याचे खबरीत म्हटले आहे. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान सदर विवाहितेचा घातपात केल्याच्या संशयावरून माहेरचे नातेवाईक संतप्त झाले होते. शीतलचे माहेर राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील आहे. तिचे वडील सुधाकर अंकुश
म्हस्के व नातेवाईकांनी संगमनेर येथील नगरपालिका रुग्णालयात येऊन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास विरोध नोंदवला. सासरच्या लोकांनी तिचा घातपात केल्याचा संशय व्यक्त करून
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तुमची तक्रार घेतो पण अंत्यविधी रोखू नका
असे सांगताना तपासात दोषी आढळल्यास कायदेशीर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.