माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळा आज अकोले तालुक्यात मोठ्या
उत्साहात झाला. या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील साखर सम्राटांना, “अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलला हद्दपार करा
शेतकऱ्यांचा पेट्रोलचा खर्च वाचवा. शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर ऊर्जा दाता बनला पाहिजे,” असे आवाहन केले. या अभिष्टचिंतन सोहळ्याला माजी मंत्री मधुकरराव पिचड, भाजपचे ज्येष्ठ नेते
आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे,
अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सोनाली नायकवाडी, आदी उपस्थित होते.नितीन गडकरी म्हणाले, “देशात साखरेचे प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. ऊस हे हमखास नफा देणारे पीक आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी साखरेपासून इथेनॉल तयार करावे. इथेनॉल विकले तरच साखर कारखाने टिकतील. पुढच्या महिन्यापासून
फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या स्कुटर, रिक्षा, ट्रक, कार, बस बाजारात येणार आहेत. या संपूर्ण इथेनॉलवर चालू शकतील अथवा इथेनॉल व पेट्रोलच्या मिश्रणावर चालतील. इथेनॉलची किंमत
पेट्रोलच्या निम्मी आहे. शिवाय दोन्ही इंधनातून वाहनांना सारखेच अॅव्हरेज मिळेल. इथेनॉलमधून प्रदुषण होणार नाही. त्यामुळे इथेनॉलची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे.
त्यामुळे मी अहमदनगर जिल्ह्याला इथेनॉल पेट्रोल पंप मिळवून देतो. अहमदनगर जिल्ह्यातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करा असे आवाहन त्यांनी केले.ते पुढे म्हणाले की, “भारतात शेतीसाठी
पोटॅशियम खतांची मागणी आहे. त्यासाठी आवश्यक पोटॅश आपल्याला आयात करावे लागते. इथेनॉल तयार करताना स्पेंटवॉश हे बॉयलरमध्ये जाळल्यावर पोटॅश निघते. हे साखर कारखान्यांत तयार
होणारे पोटॅशही सरकार 30 ते 32 रुपयांना विकत घेईल. त्यातून कारखान्यांचे उत्पन्न वाढेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”शेतकऱ्यांच्या इथेनॉलवर वाहने चालतील. इथेनॉल ग्रीन फ्युएल आहे.
त्यामुळे प्रदुषणापासून मुक्ती मिळेल. शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे. आदिवासी भागात तांदूळ पिकतो. त्यातून बायो सीएनजी, बायो एलएनजी तयार करता येतो. माझा ट्रॅक्टर
बायो सीएनजीवर चालतो. आता भविष्यातील बदलानुसार आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. वैभव पिचड व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सारख्या युवा नेत्यांनी आदिवासी, शेतकऱ्यांना
संपन्न करण्याचे मिशन हाती घ्यावे. नवीन व्हिजन घेऊन चालले तर महाराष्ट्र सुखी, समृद्ध होईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.