माय महाराष्ट्र न्यूज: राज्य सरकारने एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मोठी घोषणा केली होती. ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांना बसप्रवासात ५० टक्के सवलत मिळते.
७५ वयापेक्षा जास्त असणाऱ्यांना एसटीने मोफत प्रवास करता येतो. विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना सवलत दिली जाते. शाळेत जाणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलींना तर मोफत प्रवास करता येतो.
याच धर्तीवर महिलांसाठी ही योजना लागू करण्यात आली .दरम्यान आता सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलिसिस आणि हिमोफेलियाच्या रुग्णांना आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास
करता येणार आहे. या आजाराच्या रुग्णांना विविध वैद्यकीय सेवा आणि उपचार घेण्यासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय; तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यासाठी त्यांना नेहमी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो.
परिणामी रुग्णांचा प्रवासखर्च वाढतो. या पार्श्वभूमीवर या रुग्णांसाठी एसटी महामंडळामार्फत मोफत बससेवा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी याबाबतचे सुधारित परिपत्रक राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना
पाठविले आहे. मोफत प्रवास योजनेमुळे रुग्णांचा प्रवास खर्च वाचणार आहे. ही योजना लागू केल्याबद्दल आरोग्य विभागाने परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत. राज्यात ‘सिकलसेल नियंत्रण’ कार्यक्रम २००८ पासून २१ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे.
ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात सिकलसेलचे २२,०८२ रुग्ण असून, सिकलसेल वाहकांची संख्या दोन लाख ६१ हजार ६३३ आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.