माय महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर शिंदे यांना भाजपने थेट मुख्यमंत्रीपद बहाल केलं.
मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
फडणवीस यांचे पक्षातून पंख छाटण्यात आले असून फडणवीस यांना पर्याय म्हणून एकनाथ शिंदे यांना उभं केलं जात आहे, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. आजही दबक्या आवाजात असेच अंदाड वर्तवले जात आहेत.
पण या खेळीमागची इन्साईड स्टोरी काय होती? शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव कुणाचा होता? यावर फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात त्यांनी एकावर एक गौप्यस्फोट केले.
मी मुख्यमंत्री होणार नाही हे मी ठरवलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं. हे सरकार बदललं पाहिजे, हे सरकार आपल्या विचाराने चालू शकत नाही. तिथे हिंदुत्ववाद्यांचा जीव गुदमरतोय, यावर आमचं एकमत झालं. तेव्हा
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे हा विषय मी मांडला. मी माझ्या पक्षाकडे गेलो. माझ्या पक्षाला मी सांगितलं शिंदेंना आपण मुख्यमंत्री केलं पाहिजे. माझ्या पक्षाला कन्व्हिन्स करण्यासाठी मला बराच काळ द्यावा लागला. माझ्या पक्षाने माझा
प्रस्ताव लगेच स्वीकारला नव्हता. एकनाथ शिंदे एवढं मोठं पाऊल उचलतात. अशा परिस्थितीत त्यांचं नेतृत्व असलं पाहिजे. त्यांच्या लोकांना ते आत्मविश्वास देतील. आणि हा निर्णय झाला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर मी सरकारमध्ये राहणार नाही, असं मी माझ्या पक्षाला स्पष्टपणे सांगितलं होतं. मी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होईल किंवा मला जी जबाबदारी द्याल ती घेईल.
दोन वर्ष मेहनत करून पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करतो, असं पक्षाला सांगितलं. त्याप्रमाणे सर्व ठरलं होतं, असा दावा फडणवीस यांनी केला.