भेंडा /सुखदेव फुलारी
भेंडा-कुकाणा ६ गावांच्या ग्रामपंचायतीकडे ३४ लाख ८३ हजार रूपयांची पाणी पट्टी थकली असून नळ पाणी पट्टी थकबाकी न भरल्याने पाणी व्यवस्थापन समितीने भेंडा-कुकाणासह ६ गावांच्या पाणी पुरवठयात कपात केली असून ऐन पावसाळ्यात ६ गावातील जनतेला सध्याचे परिस्थितित ३ दिवसांआड पिण्याचे पाणी मिळत आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे १९९१ च्या जनगणने नुसार २०,३३४ व्यक्ती तर २०३० ची प्रकल्पित लोकसंख्या ४४,००० व्यक्ती गृहित धरून दरदिवशी प्रतिमाणूस ५५ लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल या क्षमतेची भेंडा-कुकाणा व इतर चार गावांची ही नळ पाणी योजना आहे .मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या उदभव धरून हि योजना उभी राहिलेली आहे.सहा गावांना दोन महिने पुरेल इतके पाणी साठवण्यासाठी २६० दशलक्ष लिटर क्षमतेचा सिमेंट काँक्रिट चा पाणी साठवन तलावाची व्यवस्था असून शुद्धीकरण प्रकल्प आहे.ही योजना कार्यन्वयीत झाल्या पासून भेंडा येथील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द,कुकाणा,तरवडी,चिलेखनवाडी व अंतरवाली या ६ गावांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे.
मात्र भेंडा कुकाणा व इतर चार गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेची थकबाकी ३४ लाख रुपये झाली आहे.त्यातच विज बिल थकबाजी विज बिल थकबाक़ी २२ लाख रुपये व मुळा पाटबंधारे विभागाची थकबाक़ी १३ लाख रुपये आहे.
मुळा पाटबंधारे विभागाची थकबाक़ी वाढल्याने पाणी सोडण्यात आलेले नाही.
पाणीपट्टी, वीजबिल, कर्मचारी पगार, क्लोरिन याचा महिन्याला सरासरी ४ ते ४.५ लाख रुपये खर्च येतो.पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत ४२ टक्के, महावितरण कंपनीने तर वीज बिलात ६८ टक्के वाढ केली आहे. शिवाय थकबाकीचे प्रमाण वाढल्याने सध्या पावसाळा असूनही ३ दिवसा आडं पाणी पुरवठा केला जात आहे.
सन २०१९-२० मध्ये पाणी पट्टी थकबाकी ३० लाख रुपयांवर गेल्याने संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीने दि.१८ सप्टेंबर २०२० पासून थकबाकीदार गावांचा पाणी पुरवठा बंद केला होता. यावेळी सुद्धा भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द,कुकाणा,तरवडी,चिलेखनवाडी,अंतरवाली या ६ गावांच्या ग्रामपंचायतीकडे सुमारे ३४ लाख रूपयांची पाणीपट्टी थकित आहे.संत ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीमध्ये पाणीपुरवठा होत असलेल्या ६ गावांचे सरपंच व ग्रामसेवक सदस्य आहेत.तरीही ग्रामपंचायत थकबाकी वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
*दैनंदिन नळ पाणीपुरवठ्यासाठी लागणारे गावनिहाय पाणी..*
भेंडा बुद्रुक (१५ लाख लिटर),
भेंडा खुर्द (२ लाख लिटर),
कुकाणा (१५ लाख लिटर),
चीलेखनवडी (१.२५ लाख लिटर),
अंतरवली (१.५ लाख लिटर),
तरवडी (२.५ लाख लिटर).
*गावनिहाय पाणी ट्टी थकबाकी अशी…*
——————————————–
अ.नं.– ग्रामपंचायत– थकित रक्कम
——————————————–
१) भेंडा बुद्रुक– १० लाख ५७ हजार
२) भेंडा खुर्द— ७१ हजार
३) कुकाणा १४ लाख ६ हजार,
४) अंतरवाली ८४ हजार,
५) चिलेखनवाडी– २ लाख ५२ हजार
६) तरवडी– ६ लाख १३ हजार
——————————————
एकूण–३४ लाख ८३ हजार रुपये
——————————————-
दरम्यान भेंडा बुद्रूक ग्रामपंचायत रिक्षा फिरवून थकबाकी वसुलीचे प्रयत्न करत आहे. यापुढे प्रत्येक ग्रामपंचायतीने अनधिकृत नळजोडणी शोधून बंद करणे, थकबाकी वसुली प्रत्येक महिन्याला करणे, असे कठोर निर्णय घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असे आवाहन पाणी व्यवस्थापन समितीने केले आहे.
*ग्रामपंचायतीनी थकबाकी भरावी…*
भेंडा-कुकाणा व इतर चार गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेची थकबाकी ३५ लाख रुपये झाली आहे.योजनेच्या तलावात थोडेच पाणी शिल्लक आहे.थकबाक़ी त्वरित न भरल्यास पाणी पुरवठा कधी ही बंद होऊ शकतो.त्यामुळे
लाभधारक ग्रामपंचायतीनी थकबाकी भरून सहकार्य करावे.–
सौ.वैशाली शिवाजी शिंदे
अध्यक्षा,संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समिती
*आमच्यावर अन्याय का?*
नळ पाणी पट्टी नियमित भरणाऱ्याना नियमित पाणी मिळत नाही.त्यामुळे जे पट्टी भरत नाही त्यांच्या कडून ती वसूल करावी किंवा त्यांचे वैयक्तिक नळ जोड तोडून पाणी पुरवठा बंद करावा. प्रमाणिक करदात्यांवर अन्याय का?
असा प्रश्न पाणी योजनेत सहभागी असलेल्या गावातील लाभधारकांनी
उपस्थित केला आहे.