माय महाराष्ट्र न्यूज:आपण इंटरनेटशिवाय घरबसल्या जसे टीव्ही चॅनेल बघतो, अगदी तसेच आता मोबाईल फोनवरही त्याचा आनंद घेता येणार आहे.
अगदी कमी खर्चात ओटीटी सामग्री पाहता येणार असून, तेही कोणत्याही डेटा खर्चाशिवाय. “डायरेक्ट टू मोबाईल’ म्हणजेच “डी2एम’ तंत्रज्ञानाद्वारे हे शक्य होणार आहे.
हे तंत्रज्ञान “डी2एच’ प्रमाणे असणार आहे.यासाठी केंद्रीय दूरसंचार विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि आयआयटी कानपूर यांनी काम सुरू केले आहे. ही टीम या तंत्रज्ञानाच्या
व्यवहार्यतेबाबत पुढील आठवड्यात दूरसंचार ऑपरेटर्सशी चर्चा करणार आहे. “डी2एम’ हे ब्रॉडबॅंड आणि ब्रॉडकास्टचे संयोजन आहे. “डी2एम’ हेच तंत्रज्ञान आहे जे मोबाईलवर एफएम रेडिओ प्रसारित करते.
फोनमधील रिसीव्हर रेडिओ फ्रिक्वेन्सी पकडेल. त्यासाठी 526-582 मेगाहर्टझ बॅंड वापरण्याची तयारी सुरू आहे.हा बॅंड सध्या टीव्ही ट्रान्समीटरसाठी वापरला जातो. सध्या देशातील 21 ते 22 कोटी कुटुंबांकडे
टीव्ही आहे. स्मार्टफोनचे 80 कोटी वापरकर्ते आहेत, जे 2026 पर्यंत 100 कोटी होणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत टीव्ही कंटेंट पाठवण्यासाठी फोन हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म म्हणून सरकार विचार करत आहे.
सरकारला त्यातून शिक्षण आणि आपत्कालीन सेवांचे प्रसारण करायचे आहे.गेल्या जूनमध्ये आयआयटी कानपूरने देशातील “डी2एम’ प्रसारण आणि 5-जी अभिसरण रोडमॅपवर एक श्वेतपत्रिका प्रकाशित केली. त्यात असे म्हटले आहे की, प्रसारक
डी2एम’ नेटवर्कवरून प्रादेशिक टीव्ही, रेडिओ, शैक्षणिक सामग्री, आपत्कालीन सूचना प्रणाली, आपत्ती माहिती, व्हिडिओ आणि डेटा-चालित ऍप्स प्रदान करण्यास सक्षम असतील. हे ऍप्स इंटरनेटशिवाय चालतील आणि त्यांना कमी पैसे द्यावे लागतील.
काही दिवसांपूर्वी सर्व नागरिकांच्या फोनवर अचानक आलेला अलर्टही याच प्रक्रियेच्या टेस्टिंगचा एक भाग असल्याचे मानले जाते. अर्थात आता “डी2एम’ ही सेवा कितीही उपयुक्त असली तरी मोबाइल
ऑपरेटर त्याला विरोध करू शकतात. कारण “डी2एम’ त्यांच्या डेटा महसूलावर परिणाम करेल.