माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील वरिष्ठ
पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षात फूट पडून आता एक वर्ष पार पडलं आहे. शिंदे गटात गेल्या वर्षभरापासून इनकमिंग सुरु आहे. ठाकरे गटातील
अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पक्षाला आणखी उभारी यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पक्षात दररोज नवनवे कार्यक्रम पार पडत आहेत. दर आठवड्याला पक्षप्रवेशाचे कार्यक्रम पार पडत आहेत. राज्यभरातील
ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. असं असताना आता शिंदे गटाच्याच वरिष्ठ पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शिवसेनेच्या कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून आपला राजीनामा पाठवला आहे. या पदाधिकाऱ्यांनी पत्रात
आपली नाराजी मांडली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.‘सिद्धेश कदम
यांच्याकडून पक्षात काम करु दिले जात नाही’, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पदाधिकाऱ्यांची संख्या ही तब्बल 30 ते 40 इतकी आहे. “आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण कदमांना समज द्या”, असं पदाधिकाऱ्यांनी
पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.मालाडचे विधानसभा संघटक नागेश आपटे यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मी मालाडमध्ये पक्षासाठी
सुरुवातीपासून काम करत आहे. आता मालाडमध्ये जे काही सुरुय, पदावरुन लोकांना काढणे यामुळे पदाधिकारी चिंतेत आहेत. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार आहोत”, असं नागेश आपटे यांनी सांगितलं आहे.