नेवासा
जायकवाडी धरणात अगोदर पश्चिम वहिनी नद्यांचे पाणी आणा आणि मगच छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी समांतर पाणी योजना चालू करा अशी मागणी करून या समांतर पाणी योजनेला विरोध करण्यासाठी १५ ऑगस्ट पासून सह्यांची मोहिम सुरु करत असल्याची माहिती अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिली
अधिक माहिती देताना श्री सूर्यवंशी पुढे म्हणाले की,
छत्रपती संभाजीनगर शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी २५०० मिलिमिटर व्यासाच्या मुख्य पाईप लाइनचे काम सुरु आहे.या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराला दररोज २४ तास पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे जायकवाडीतून भरमसाठ पाण्याचा उपसा होणार आहे.
जायकवाडी धरणातून सध्या संभाजीनगर, पैठण, जालना, बिडकीन,वाळुंज,शेंद्रा शहर व एमआयडीसीसाठी पाणीपुरवठा होत आहे. त्यात या नवीन पाईपलाईनचा भर पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जायकवाडीतील पाणी किती शिल्लक राहील हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावर कोणी चर्चा करत नाही. खरंतर समन्याय पाणी वाटपाबरोबरच पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी जायकवाडी धरणात आणणे फार महत्त्वाचे होते. जायकवाडीत पाणी आणण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही मात्र पाणी उचलण्याचा जोरदार कार्यक्रम केला जातो या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकऱ्यांची शेती यामुळे अडचणीत येणार आहे संभाजीनगर शहरासाठी होत असलेल्या नवीन समांतर पाईपलाईन मुळे एका कालव्यातून जेवढे पाणी दिले जाते तितकेच पाणी या पाईपलाईन द्वारे उचलल्या जाणार आहे त्यामुळे जायकवाडी धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक राहणार नाही एमआयडीसीचे पाणी पुरवठ्यावर कोणाचे नियंत्रण नाही, भरमसाठ पाणी उपसा केला जात आहे. शेतकरी असाच गाफील राहिला तर जायकवाडीचे धरणाचे संपूर्ण पाणी हे केवळ संभाजीनगर शहर व एमआयडीसीसाठीच राखीव राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक होऊन विरोध करण्याची गरज आहे.
अगोदर पश्चिम वाहिन्यांचे पाणी जायकवाडीत आणा मगच समांतर पाणी योजनेच्या मोटारी चालू करा.
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व या समांतर पाणी योजनेला विरोध करण्यासाठी करण्यासाठी
१५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जायकवाडी धरणाचे शिल्पकार स्व.शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्या समोर “आधी पश्चिम वाहिन्यांचे पाणी मगच समांतर” या आशयाचे घोष वाक्य घेवून सह्याची मोहीम सुरू करत आहे.पासून नव्याने पाणी संघर्षाचा बिगुल वाजवणार असून सह्यांची मोहिम सुरु करण्यात येत आहे.
शेतकरी आज जागा झाला नाही तर भविष्यात शेतीला पाणी मिळणार नाही.त्यामुळे या सह्यांचे अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन श्री.सूर्यवंशी यांनी केले आहे.
माजी आ.नरेंद्र घुलेंची २० वर्षा पासुनची मागणी….
शेवगाव-नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील हे नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष व कायमस्वरूपी दुष्काळाचे निवारण करायचे असेल, तर नदीजोड प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी गेल्या २० वर्षापासून करीत आहेत,त्यासाठी ते सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा ही करत आहेत.
समुद्राला वाहून वाया जाणारे पश्चिमे कडील हे सर्व पाणी गोदावरी खोऱ्यात आले तर भंडारदरा, मुळा, जायकवाडी, निळवंडे या धरणांसह छोटे-मोठे बंधारे भरून याचा फायदा अहमदनगरसह संपूर्ण मराठवाड्याला होणार आहे. परिणामी, हा भाग सुजलाम् सुफलाम् होणार आहे.