माय महाराष्ट्र न्यूज:मुळा डावा कालवा लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी मंगळवारी 300 क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने लाभधारक शेतक-यात समाधान व्यक्त केले जात आहे.
गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणातून मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिकांसाठी 131 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. मुळा धरणातून डावा कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी
वेळेवर सोडण्यात आलेले पाणी हे उभ्या पिकांसाठी संजीवनी ठरणार आहे.समाधानकारक पाऊस नसल्याने यंदा खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. काही भागात जेमतेम पावसावर
पेरण्या करण्यात आल्या. मात्र समाधानकारक पाऊस झाला नसल्याने उभ्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसिंचनासाठी पाणी सोडण्यात यावे, ही मागणी झाल्याने
नगर येथे नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठराव संमत करून गोदावरी महामंडळाच्या परवानगीने पाणी सोडण्याचे आदेश मुळा पाटबंधारे विभागाला देण्यात आले.
मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील 10 हजार 122 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून पाणी आवर्तनाचा कालावधी २५ दिवसांचा आहे.एकिकडे लाभक्षेत्रात पावसाने दडी मारली असून दुसरीकडे कोतूळकडून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक
कमी झाल्याने 26 हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा प्रवास लांबत चालला आहे. मागील वर्षी 15 ऑगस्टला मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने पाणी पातळी समान राहण्यासाठी
धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. मुळा धरणाच्या डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात 10 हजार 122 हेक्टर, तर उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात 77 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे.
यावर्षी गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा 20 हजार 549 दशलक्ष घनफूट झाल्याने धरण 79 टक्के भरले. धरणाची पाणीपातळी 1801.90फूट आहे. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता
कोतूळकडून मुळा धरणात 1273 क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. 8 जून ते 17 ऑगस्ट या कालावधीत कोतूळकडुन मुळा धरणात 12 हजार 100 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले.