Saturday, September 23, 2023

लेखापरीक्षण करणाऱ्या पाणी वापर संस्थांना स्थानिक पातळीवरच पाणी पट्टी परतावा मिळणार

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नाशिक/प्रतिनिधी

वसुल झालेल्या पाणीपट्टीतून पाणी वापर संस्थेच्या खर्चाचा ताळमेळ बसण्यासाठी संस्थेने सर्वच बाबतीत लक्ष ठेवून व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.तसे जर होत नसेल तर संस्थांनी कायद्यातील तरतूदीनुसार इतर पूरक उद्योग करुन आपली आर्थिक गरज भागवावी असे आवाहन करून लेखापरीक्षण करणाऱ्या पाणी वापर संस्थांना स्थानिक पातळीवरच पाणी पट्टी परतावा मिळणार असल्याची माहिती
जलसंपदा विभागाचे सचिव डॉ.संजय बेलसरे यांनी दिली.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण,मुंबई गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ,संभाजीनगर व महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था,नाशिक यांचे वतीने महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रबोधिनी,नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील वापर पाणी वापर संस्थाकरिता नुकतीच एक दिवसीय  कार्यशाळा संपन्न झाली, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन  डॉ. बेलसरे बोलत होते.
मेरीचे महासंचालक श्री.मांदाडे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.तिरमनवार,महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या लेखापाल श्रीमती श्वेताली ठाकरे, मुख्य अभियंते श्री.देवगडे व श्री.मिसाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

डॉ. बेलसरे पुढे म्हणाले की,१५ आॕक्टोबरच्या धरणातील पाण्याचे नियोजन करुन सिंचनासाठी किती व कसे  पाणी उपलब्ध होते याचे अनुमान काढावे व त्याच बरोबर आपले परिसरातील भूजलाचे पाणी विचारात घेऊन पिकाचे नियोजन करावे. पाणी वापर संस्थांनी सुरुवातीसच पाणी मोजून घेण्याची शिस्त अंगी बानवावी.त्यामुळे सिंचन व्यवस्थापन उत्कृष्ट होऊन कार्यक्षमतेतही सुधारणा होते.उपसा पाणी वापरकर्त्यांनी पाणी मोजण्याचे मीटर बसविले नसल्याने त्यांना पाण्याची आकारणी जास्त येत असल्याचे निदर्शनास आल्याने उपसा पाणी वापरकर्त्यांनी त्वरीत पाण्याचे मीटर बसविण्याचे आवाहन त्यांनी केले.या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व माहित आहे.त्यामुळे ते निश्चितपणे शासनास सहकार्य करुन पाणी मोजून घेण्याची व्यवस्था करुन सिंचन व्यवस्थापनेचे रोल माॕडेलची निर्मिती करतील,असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
तसेच ज्या पाणी वापर संस्था कार्यक्षमपणे  व्यवस्थापन करुन आपले कार्यकक्षेत मुल्यवर्धित पिके घेतात,तेथील संस्थांनी फाॕर्मर प्रोड्युसर कंपनी कार्यान्वित करण्याचा विचार करावा.पाणी आणि पैसा दोन्ही महत्वाचे घटकाचे ध्येय संस्थांनी डोळ्यासमोर ठेवून फाॕर्मर प्रोड्युसर कंपनी जाणीवपूर्वक चालवावी.पाणी वापर संस्थेतील व्यवस्थापनेत महिलांचा सहभाग सक्रिय करण्यावर भर देण्याचे सांगून पुढे ते म्हणाले कि,शासन आता यापुढे ज्या पाणी वापर संस्स्था आपले लेखापरीक्षण करुन घेतील त्या संस्थांनाच परतावा स्थानिक पातळीवर परत करण्याची व्यवस्था करीत असल्याचे सांगितले.

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या लेखापाल श्रीमती श्वेताली ठाकरे म्हणाल्या,पृथ्वी तलावावर एकूण उपलब्ध पाण्यापैकी ९७% पाणी हे समुद्रात असते व ते क्षारयुक्त असते.फक्त ३% पाणी हे गोड्या स्वरुपात असते.या तीन टक्क्यापैकी ६९% पाणी हे हिमशिखरामध्ये गोठलेल्या स्वरुपात असते.३०% पाणी हे भूगर्भात असते व उर्वरीत १% पाणी भूपृष्टावर उपलब्ध आहे.जगात पाण्याबद्दलच्या धोरणात सहभागी सिंचनाला महत्व देण्यात आलेले आहे.पाण्याचा वापर काटकसरीने करुन मर्यादित उपलब्ध पाण्याचे आर्थिक मुल्य ( एकोनाॕमिकल व्हॕल्यू ) वाढविले पाहिजे.महिलांना आपल्या संसारात काटकसर करण्याची संवय असल्याने त्यांनी आता पाणी वापर संस्थामध्ये सक्रिय होऊन आपले गांवाचे शाश्वत विकासाला चालना द्यावी.शेवटी जगाच्या लोकसंख्येपैकी १८% लोकसंख्या (१४३ कोटी ) भारतात असल्याने  प्रत्येकाने जीवमात्रास व पर्यावरणास लागणारे पाणी उपलब्ध करुन देणेसाठीही प्रयत्नशिल राहण्याचे आवाहन त्यांनी केले.महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून अधिनियमातील कलम क्र.५९अन्वये पाणी वापर संस्थांनी त्यांचे दरवर्षी लेखा परिक्षण करणे अनिवार्य असल्याचे सांगून तिरमनवार पुढे म्हणाले कि,महाराष्ट्रात पाणी वापर संस्थेची चळवळ सन १९८९-९० मध्ये सुरु झाली.पाणी वापर संस्थांनी सिंचन व्यवस्थापन केल्याने पाण्याचे कार्यक्षमतेत वाढ झाल्याने पाणी वापर संस्थांचे हितार्थ शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.आता पाणी वापर संस्थांचे माध्यमातून आपण जुनी फड पध्दतच एक प्रकारे पुर्नजीवित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मेरीचे महासंचालक श्री.मांदाडे पुढे म्हणाले कि,शेतकऱ्यांनी उपलब्ध असणारे पाणी विचारात घेऊन पिक रचना  करुन ठिबक सिंचनाचा वापर करुन कमी पाण्यात येणारी मुल्यवर्धित पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत.पाणी वापर संस्थासाठी शेतकऱ्यांनी निधी जमवून आता शासनावर अवलंबून राहू नये.पाणी वापर संस्था सक्षम होणेसाठी प्रथम सिंचन व्यवस्थापनेचे तंत्र अवगत करुन इतर पूरक उद्योगासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले.
सहकार खात्याचे प्रमाणित लेखा परीक्षक अपसुंदे यांचे लेखा परीक्षणाचे महत्व, वाल्मीचे सहाय्यक प्राध्यापक भागवत यांचे पाण्याचे मोजमाप (भाग१ ) तर दुपारचे सत्रात  ग्लोबल वाॕटर मॕनेजमेंट व ट्रेनिंग इन्स्टीट्युट, विल्होळी येथील लक्ष्मीकांत वाघवकर यांचे पाण्याचे मोजमाप यावर व्याख्यान झाले.

ट्रेनिंग इन्स्टीट्युटचे कार्यकारी संचालक वाणी व त्यांचे सहकाऱ्यांनी पाण्याचे मोजमाप साधनांचे प्रात्यक्षिक करुन दाखाविले.सर्व उपस्थितांना जलसंपदा विभागातर्फे प्रमाणपत्र देण्यात येऊन कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

अधीक्षक अभियंता व प्रशासक महेंद्र आमले यांनी पाणी वापर संस्थांचे पदाधिकाऱ्यांकरीता पाण्याचे मोजमाप कसे करावे व का करावे या विषयी माहिती दिली. शेतकरी प्रतिनीधी श्री. दवंगे व श्री.काळे यांचे मनोगत झाले.
उत्तर महाराष्ट्रातील दोनशे पेक्षा जास्त  शेतकरी प्रतिनिधी व अभियंते कार्यशाळेस उपस्थित होते.

अधीक्षक अभियंता श्री. आमले व श्री शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली  पालखेड विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत व प्रबोधिनीचे कार्यकारी अभियंता श्री.पाबळे व उपअभियंता प्रमोद कुलकर्णी यांचे टीमने कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!