माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाणचे तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर हत्याकांडातील सूत्रधार माजी सरपंच राजाराम शेळके याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना पारनेर न्यायालयाने 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी दिले.
प्रकाश कांडेकर यांच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा भोगत असलेल्या राजाराम शेळके व त्याचा मुलगा राहुल वर्षभरापूर्वी पॅरोलवर सुटले होते. शेळके शुक्रवारी शेतामधील काम करून घराकडे निघाला होता. तेवढ्यात अज्ञात मारेकर्यांनी धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
शेळकेचा मुलगा राहुल याने सुपे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगव्हाणचा उपसरपंच राजेश शेळके, प्रकाश कांडेकर यांचा भाऊ सूर्यभान कांडेकर, मुलगा संग्राम कांडेकर व अनिकेत कांडेकर यांच्यासह गणेश भानुदास शेळके, भूषण प्रकाश कांडेकर, सौरभ इंद्रभान कांडेकर, अक्षय पोपट कांडेकर यांच्याविरोधात
कट करून शेळकेची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सुपे पोलिसांनी राजेश शेळके, सूर्यभान कांडेकर, संग्राम कांडेकर व अनिकेत कांडेकर यांना रात्रीच अटक केली. उर्वरित आरोपी पसार आहेत. चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी पारनेरच्या न्यायालयापुढे उभे केले असता तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी आरोपींना पोलीस कोठडीची मागणी केली.
हत्येचा कट कोठे रचला? त्यासाठी कोणाला सुपारी दिली होती? गुन्ह्यात वापरलेले हत्यार ताब्यात घ्यायचे आहे, कटाविषयी चौकशी करायची आहे, इतर आरोपींना अटक करायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी गोकावे यांनी केली.