माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात राहणाऱ्या एका शिक्षिकेने इमामपूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वंदना रेपाळे असं या शिक्षिकेचं नाव असून त्या धनगवाडी येथील शाळेत नोकरीला होत्या.
नगर-औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर परिसरात विहिरीत महिलेचा मृतदेह सोमवारी आढळून आला होता. ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. सुरुवातीला त्या महिलेबद्दल गावकऱ्यांना काहीच माहिती नव्हती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढला.
त्यानंतर तपास सुरू झाला. शेवटी मृत महिलेची ओळख पटली. वंदना रेपाळे (रा. पाइपलाइन) असं त्यांचं नाव असून त्या धनगरवाडी येथे शिक्षिका होत्या, असं पोलिसांनी सांगितलं आहे.वंदना रेपाळे या गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होत्या. याबाबत नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे.
विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यांच्या पर्समध्ये ही सुसाईड नोट सापडली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘मला मणक्याचा त्रास असल्याने आत्महत्या केली आहे.’ याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी माहिती दिली आहे.