माय महाराष्ट्र न्यूज:स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार नगर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये सतत भांडणे लावतात. यावेळीही त्यांना उमेदवार मिळत नव्हता तर त्यांनी आयात केलेला उमेदवार लादून नकारात्मक प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आमचा संघर्ष पवार यांच्या
या भूमिकेविरोधातच राहणार. मतदारांनाही हे कळून चुकले असून जनता त्यांना पुन्हा एकदा मतपेटीतून उत्तर देणार आहे,’ असा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.अहमदनगरमध्ये विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व घटक पक्षांचे लोकप्रतिनिधी,
पदाधिकारी उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, ‘सध्याची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची संकल्पना घेऊन लढत आहोत. गेल्या दहा वर्षांत केलेली कामे सांगत आगामी योजना सांगत आहोत. मात्र, विरोधकांकडून केवळ नकारात्मक राजकारण केले जात आहे’.नगर जिल्ह्यात गरीब- विरूद्ध श्रीमंत असा निवडणुकीचा मुद्दा
कधीच उपस्थित झाला नव्हता. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे पवार यांनी आयात केलेला उमेदवार लादला आहे. आता त्यांच्यामार्फत नकारात्मक राजकारण खेळले जात आहे. नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अस्थिर ठेवायचे, सतत नेत्यांमध्ये भांडणे लावायची हेच प्रकार पवारांकडून केले जातात.
त्यांनी जिल्ह्यासाठी कधीही नवीन योजना आणल्या नाहीत. विकासाचे मुद्दे मांडले नाहीत. राज्यात आणि केंद्रात सत्ता पदांवर असतानाही त्यांना जिल्ह्याचे भले करता आलेले नाही. आता आम्ही ते काम सुरू केले आहे, तर त्यात नकारात्मक राजकारण करून खोडा घातला जात आहे. त्यामुळे आमचा संघर्ष या
लादलेला उमेदवाराविरूद्ध नव्हे तर थेट पवार यांच्या या भूमिकेविरूद्धच राहणार आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.आमच्यावर वैयक्तिक टीका केली, प्रचाराला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, तरीही आम्ही उत्तर देण्यापेक्षा आमचे काम करीत राहू. गेल्या काळात आम्ही केलेली कामे जनतेसमोर आहेत.
त्या आधारेच आम्ही निवडणूक लढवित आहोत,’ असेही विखे पाटील म्हणाले.