माय महाराष्ट्र न्यूज :नेवासा तालुक्यातील वाकडी येथे जनावरांचे शेण-मूत्र साठवलेल्या विहिरीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या एकाच कुटुंबातील विशाल काळे,अनिल काळे,माणिक काळे,संदीप काळे या 4 व्यक्तींवर बुधवार दि.10 एप्रिल रोजी सकाळी वाकडी येथे शोकाकुल वातावरणात एकाच ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला.तर बाबासाहेब गायकवाड यांचे वर सलाबतपूर येथे अंत्यविधी करण्यात आला.
मंगळवार दि.9 एप्रिल रोजी ऐन पाडव्याच्या दिवशी जनावरांचे शेण-मूत्र साठवलेल्या विहिरीत पडलेले मांजरीला काढण्याकरिता विहिरीत उतरलेल्या विशाल उर्फ बबलू अनिल काळे (वय 28 वर्षे) हा विहिरीत बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी विहिरीत उतरलेले अनिल बापूराव काळे (वय 55 वर्षे),माणिक गोविंद काळे (वय 65 वर्षे),संदीप माणिक काळे (वय 32 वर्षे) व बाबासाहेब भगवान गायकवाड (वय 40 वर्षे) या पाच व्यक्तींचा
विहिरीतील बायोगॅसने गुदमरून व शेण-मूत्र मिश्रित गाळात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.नगर-छ.संभाजीनगर येथून आलेल्या रेसिक्यु टीमने पोकलेन मशीनच्या सहाय्याने विहिरीमधील पाच ही मृतदेह मंगळवारी मध्यरात्री बाहेर काढले होते.नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रशासनाने बुधवार दि.10 रोजी सकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. काळे कुटुंबातील
उर्फ बबलू अनिल काळे,अनिल बापूराव काळे,माणिक गोविंद काळे व संदीप माणिक काळे यांच्या पार्थिवावर वाकडी येथील काळे वस्तीवर सकाळी 10 वाजता शोकाकुल वातावरणात एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आला.मयत विशाल उर्फ बबलू काळे हा अविवाहित होता,त्याचे मागे आई व एक भाऊ असा परिवार आहे.तर संदीप काळे यांचे एक वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्याला एक मुलगी असून त्याचे मागे आई,पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
या घटनेने नेवासा तालुक्यास संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे.दरम्यान या घटनेतील कामगडी असलेल्या सलाबापूर येथील बाबासाहेब भगवान गायकवाड या व्यक्तीचा ही विहिरीत बुडून मृत्यू झालेला आहे.त्याच्या ही मृतदेहावर सलाबापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.त्याचे मागे आई,भाऊ,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.दरम्यान विहिरीतील गॅस लागून अस्वस्थ झालेला विजय माणिक काळे (वय 35 वर्षे) याचेवर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
तर ज्या मांजरीला वाचविण्यासाठी हे पाच जीव गेले ती मांजर बबलूने स्वतः बेशुद्ध होणे पूर्वी विहिरी बाहेर फेकल्याने ती वाचली आहे .नेवासाचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी घटना घडल्याचे दिवशी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेऊन काळे कुटुंबियांना धीर दिला.तर नेवासाचे आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी सकाळी अंत्यविधीला उपस्थित राहून काळे कुटुंबियांचे सांत्वन केले.
काळे परिवाराचे विशाल काळे,अनिल काळे,माणिक काळे,संदीप काळे हे एकाच कुटुंबातील चार व बाबासाहेब गायकवाड अशा पाच व्यक्तींवर काळाने झडप घातलेली आहे.हे सर्वजण गरीब शेतकरी-शेतमजूर कुटुंबातील कर्ते पुरुष होते.त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरपला असल्याने शासनाने या कुटूंबियांना त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी वाकडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे कडे केली आहे.