नेवासा
छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज,म.ज्योतीराव फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर या आणि इतर महापुरुषांनी
केलेला त्याग,समाजासाठी केलेलं काम आणि त्याग यावरच आजचा पुरोगामी महाराष्ट्र उभा आहे असे प्रतिपादन माजी आ.पांडुरंग अभंग यांनी केले.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे राहुल जावळे यांच्या पुढाकाराने जाणता राजा गृप व समता परिषदेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसूर्य म.ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री.अभंग बोलत होते.समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, माजी सरपंच एकनाथराव कावरे,अब्दुलहाफिज शेख,राहुल जावळे, भगवानराव खाटीक, अमोल अभंग,जलमित्र सुखदेव फुलारी, रावसाहेब जावळे, आत्माराम लोंढे, प्रा.संजय चव्हाण, नामदेवराव उंडे, अशोक भुमकर, डॉ.गणेश आरले, शंकर कन्हेरकर, अनिल गर्जे, सोमनाथ कचरे,
इस्माईल शेख,सुनील पंडित,जावेद शेख,समीर पठाण, इन्नुसभाई नालबंद, डॉ आर्ले गणेश,सुभाष चौधरी, मनोज हुलजूते, अशोक दरवडे, आत्माराम लोंढे , सिद्धार्थ कावरे , राजेंद्र राऊत,विराज देशमुख, बाळासाहेब विधाटे, डॉ. सुभाष भागवत आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.अभंग पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आठरापगड जातींच्या लोकांना सन्मान पूर्वक वागणूक दिली.सामान्यांच्या मनातील स्वराज्य निर्माण केले.महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे खुली केल्याने समाजामध्ये शिक्षणाची दार खुली झाली. मुली शिकायला लागल्या आणि शिक्षण घेऊन उच्च पदस्थ व्हायला लागल्या. महिला राष्ट्रपती, पंतप्रधान झाल्या.अनेक क्षेत्रात स्त्रिया आज पुढे आल्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सामाजिक शांतता,शिक्षणाचा अधिकार,तर सर्व सामान्य जनतेसाठी समतेचा अधिकार दिला, त्यामुळे युवकांनी या त्रिमूर्तींचा आदर्श घेऊन सामाजिक शांतता,जातीय सलोखा राखला पाहिजे.
बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी पैसा खांबाला टेकून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला.तो समाजासाठी दिशादर्शक ग्रंथ आहे.भगवत गीतेत संस्कृतमध्ये अडकलेले तत्त्वज्ञान मराठी भाषेमध्ये रूपांतर करून खऱ्या अर्थाने जीवन कसे जगावे याचा विचार मांडला. आपल्यामध्ये चार वर्णन निर्माण झाले आणि पुढे त्याला वेगळा मुलामा दिला गेला. स्त्री आणि शुद्रांना समाजामध्ये जाण्याचा अधिकार नाही, शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, स्त्री आणि शूद्र यांनी फक्त उर्वरित तिन्ही वर्गाची सेवा करायची एवढेच काम फक्त त्यांना त्यावेळेला दिले गेले होते.
सोळाव्या शतकामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला, तुकाराम महाराजांनी सुद्धा जाती व्यवस्थेवर
प्रहार केले.
राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. या संत आणि समाज सुधारकांनी
जवळ काही नसताना ही जी काही क्रांती केलेली आहे तो इतिहास आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.या सर्वांनी
समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले.
अब्दुलहाफिज शेख,प्रशांत शिंदे,सोमनाथ कचरे,श्रीधर कासार, रावसाहेब जावळे यांनी आपले विचार मांडले.
रज्जाकशहा इनामदार यांनी प्रास्ताविक केले.प्रा.शकूर शेख यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.संजय चव्हाण यांनी आभार मानले.