नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीमद भागवत कथेचे ४ थे पुष्प गुंफतांना प्रकाशानंदगिरीजी महाराज पुढे म्हणाले की, धर्म कार्यात सर्वांनी योगदान दिल्याने प्रभू कृपा होते. धर्माच्या कार्यातसर्वांनी तन , मन,धनाने सहभाग घ्यावा. मोक्षासाठी साधना, भगवंताचे नामस्मरण करा,नाम चिंतनात खूप ताकद असून कलीयुगातील दुःखे हरण करण्याचा तो सर्वात सोपा मार्ग आहे.
भाग्य, वैराग्य, तप या बाबींचा उद्बोध भागवत ग्रंथात होतो. भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. व्यक्ती गुणांने अधिक असेल तर वंदन, कमी असेल तर दया, आणि समान असेल तर मैत्री करा. या तीन गोष्टींची शिकवण धृवाला मिळाली होती. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. मनुष्य जस जसे चिंतन करतो तसतसा त्याचा स्वभाव बनतो. भजन चिंतनात खरं सुख आहे. मनांवर विश्वास ठेवायला शिका, सत्संगरुपी चिंतन मानवाला अनेक गोष्टी शिकवत असते. आपल्या हातून घडलेल्या पापावर नरक अवलंबून असतो. मनरुपी तारा कधी तुटू देऊ नका. त्यातून भागवत भक्तीचा विश्वास दृढ होतो. दुर्जनाला सज्जन बनविण्याचे काम संत महंतांचे असते. नाम कधीही, कसेही, कुठेही, कसंही घेतले की त्यातून अंकुर फुटत असतात. सद्बुद्धी केलेला विचार भंगवताकडे घेऊन जातो. बजरंगबलींना भक्ती योग्य दिसली की ते कृपा करतात. अंतःकरणातून देवाचा धावा करा ते संकटातून सोडवतात आणि योग्य मार्ग दाखवतात.जीवनात सुख-दुःख येत असतात. दुःख आले तर समजून जा की आपल्याला जीवनात सूख येणार आहे. नेहमी साधना करा, भक्ती करत रहा.
भगवंत कोणत्याही रुपात भक्तांना।दर्शन देत असतात.भागवतातील विविध स्कंदांचे महंत स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज यांनी विश्लेषण केले.