भेंडा/नेवासा
भक्ती हा पराकोटीचा मार्ग आहे. ईश्वरीय साधना मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखवते असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे उत्तरअधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त श्रीराम सेवा मंडळ
आयोजित श्रीमद भागवत कथेचे ५ वे पुष्प गुंफतांना भागवताचार्य प्रकाशनंदगिरी महाराज पुढे म्हणाले की, हे प्रत्येकाला समजत असूनही त्याची आवड निर्माण होत नाही. त्यामुळे कलियुगात दिवसेंदिवस समस्या वाढत आहे. भक्ताला प्रत्येक संकटातून मुक्त करतो तो भगवंत आहे. भगवान श्रीकृष्ण सवंगड्यांबरोबर यमुनेच्या तिरी चेंडू फळी खेळण्यांत दंग होत असे. पण आज कलियुगात अभासी दुनियेत युवा पिढी व्यस्त झाली आहे. तेव्हा प्रत्येकाने अभासी दुनियत स्वतःला किती गुंतवणू घ्यायचे हे ठरवले पाहिजे.
धार्मिक घटनांचे विवेचन करा, ग्रंथ वाचा त्यातून स्वतःला ज्ञान समृद्ध करा. भक्ताच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी भगवान परमात्मा सदैव तत्पर असतात मात्र त्यासाठी आपल्या मुखात त्याचे नामस्मरण आले पाहिजे. मनाला ‘सु’मन बनवा म्हणजे भगवंत त्यात वास करेल. जीवन क्षणभंगुर आहे हे प्रत्येकाला ज्ञात होऊनही हाव सुटत नाही.जो मनापासून आणि श्रध्देने भक्ती करेल त्यांना मारुतराय प्रसन्न होतील.जो नित्य हनुमान चालीसा पठण करेल त्यांना एकदिवस मारूतराय दर्शन देतील.
आपण सगळे प्रभूची लेकरे आहोत. आपण ज्या देशात रहातो तो देश-देशाची संस्कृती विषयी प्रेम आणि राष्ट्राविषयी नेहमी आदर असावा. भक्तांचीची भक्ती निर्मळ असेल तर त्यांना भगवंत प्रसन्न होतात. त्याच बरोबर आपण आपल्या समोर प्रभू रामचंद्रांचे चरित्र ठेवले तर आपले जीवन आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही.
पाचव्या दिवशीच्या कथेत समुद्र मंथन कथा, मोहिनी अवतार कथा, वामन चरित्र कथा, राम जन्मोत्सव, राम कथेचे विश्लेषण केले.