भेंडा/नेवासा
परमार्थामध्ये सावधपणे चालावे लागते.आचरण शुद्ध ठेवावे लागते,स्वतःला सांभाळले लागते. सील व आचरणाला तडा गेला तर तो पुन्हा सांधता येत नाही. इंद्रियेला विषयापासून दूर करणे अत्यंत कठीण आहे, पण प्रयत्न केला तर काही अवघड नाही. आचार हाच वारकरी संप्रदायाचा पाया आहे असे प्रतिपादन श्रीक्षेत्र आळंदीच्या मीराबाई महाराज मिरीकर यांनी केले.
श्रीक्षेत्र भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीमद भागवत कथेचा व हनुमान जयंती उत्सवाची सांगता
मंगळवार दि.२३ रोजी सकाळी ८ वाजता श्रीक्षेत्र आळंदीच्या मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याचे किर्तनाने झाली,त्यावेळी त्या बोलत होत्या.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचेसह परिसरातील भाविक यावेळी उपस्थित होते.
मीराबाई महाराज मिरीकर पुढे म्हणाल्या की,जीवनात काही गोष्टी अशा येतात की त्यांना विलंब करून चालत नाही.मानापमान गुंडाळून आध्यात्मिक क्षेत्रात यावे.नामाने सर्व गोष्टी साध्य होतात.परमार्थ करायचा असेल तर संत, देवाच्या मागे जावे.ज्यांचे मन संतुष्ट नाही तो व्यक्ती दरिद्री असतो.आचारहीन माणसाला वेद ही पवित्र करू शकत नाही. डोळे हे रूपाची भोक्ते आहेत, परंतु परस्त्रीला ही मातृत्वाच्या दृष्टिकोनातून बघण्याची छत्रपती शिवाजी महाराजां सारखी नजर असावी. हनुमान जन्मोत्सव दिवस हा पवित्र दिवस आहे. हनुमानराय संकटमोचन हे आहेत.
काल्याचे किर्तना नंतर उपस्थित भाविकांना कैलास निकम, गणपतराव फुलारी,कारभारी फुलारी,भाऊसाहेब मिसाळ,श्रीपतराव फुलारी,अर्जुन शिंदे, नवनाथ फुलारी,बबनराव मिसाळ, एकनाथ फुलारी,रवींद्र डौले यांनी काल्याचा महाप्रसाद देण्यात आला.
*देखाव्याला परमात्मा कधीच भुलत नाही*
मोठ्या गाड्या, मोठा थाट, बडेजाव आणि देखावा आहे पण आत फुसक, याचा काय उपयोग. त्यात तथयांश कुठे आहे ? देखाव्याला परमात्मा कधीच भुलत नाही,असा प्रत्यक्ष टोला मीराबाई महाराज मिरीकर यांनी बडेजाव करणाऱ्या महाराज मंडळींना लगावला.
*हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा*
श्रीक्षेत्र भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सकाळी ६ वाजता लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांच्या हस्ते बजरंग बलींच्या स्वयंभू मूर्तीची विधीवत पूजा करून पंचामृत अभिषेक, गंगाजल अर्पण करत फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडुभाऊ काळे, ज्ञानेश्वर कारखान्याचे सेक्रेटरी रविंद्र मोटे, अशोकराव मिसाळ,हेमंत कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.