Wednesday, February 11, 2026

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर दि.१३ सप्टेंबर २०२५

कुटुंबप्रमुखाच्या अपघाती मृत्यूबद्दल वारसांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये मंजूर करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते वारसांना धनादेश प्रदान करण्यात आला.

करंजी (ता. पाथर्डी) येथील रहिवासी अनिल शिवाजी भाकरे (वय ३६) हे टाकळी काझी (ता. नगर) येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. नगर-पाथर्डी रस्त्यावर दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी हॉटेल सिद्धीविनायक येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. मयत अनिल भाकरे यांच्या पश्चात पत्नी, वयोवृद्ध आई-वडील व दोन लहान मुले असा परिवार उरला आहे.

अनिल भाकरे यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाने ॲड. मधुकर कोरडे यांच्या मार्फत येथील मोटार अपघात न्यायाधिकरणासमोर नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. हा दावा चोलामंडलम एमएस जनरल विमा कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणात विमा कंपनीतर्फे ॲड. गिरीजा गांधी यांनी बचाव दाखल केला. या दुर्दैवी अपघातातील मयताच्या वारसांना जलद व योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी अर्जदार व कंपनीच्या वकिलांनी प्रयत्न केले. अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये अर्जदार व विमा कंपनीचे मॅनेजर विशाल गुप्ता व श्रद्धा पूर्णपात्रे यांनी वकिलांच्या समवेत चर्चा करून समन्वय साधला. या अपघातातील मयताच्या वारसांना लोकन्यायालयामध्ये एक कोटी रुपयांची भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले व तसा धनादेश देण्यात आला.

जिल्हा न्यायाधीश के. एस. कुलकर्णी व ॲड. भूषण बहाटे यांच्या पॅनेलसमोर हे प्रकरण समोपचाराने निकाली काढण्यात आले. ॲड. सिद्धांत गांधी व ॲड. आरती सरोदे यांनी सहाय्य केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!