माय महाराष्ट्र न्यूज:कापूस पिकातून १ लाख २० हजार ५०२ कोटी रुपयांचे विदेशी चलन मिळत आहे. तरीदेखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे शासनाचे
दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत आमचे सरकार आल्यास कापसाला क्विंटलमागे ५०० रुपयांचा बोनस दिला जाईल, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
बुधवारी (ता. ७) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. श्री. आंबेडकर म्हणाले, की कापसाला पांढरे सोने म्हटले जाते. परंतु या सोन्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत सरकारचे
धोरण विरोधाभासी राहिले आहे.आयात-निर्यात धोरणातील विसंगतीमुळे कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे. शेतकरी नाइलाजाने इतर पर्यायी पिकांकडे वळत आहे.
आम्ही सत्तेवर आल्यास कापसाला पूर्वीप्रमाणे ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेऊ. कापसाला मिळणारा कमी दर हेच एक कारण कापसाखालील क्षेत्र कमी होण्यास कारणीभूत नाही.
कापूस वेचणीकामी मजुरांच्या उपलब्धतेच्या अडचणीचा सामनाही कापूस उत्पादकांना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून किलोमागे पाच रुपयांचे अनुदान
देण्याचाही विचार आहे. राज्यातील ईजीएस निधी वर्षाला ३२ हजार कोटी जमा होतो. कापूस वेचणाऱ्यांची नोंद गटविकास अधिकाऱ्यांकडे केल्या जाईल.आम्ही सत्तेवर आल्यास शेतीशी निगडित सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवू,
अशी हमीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली. शेती क्षेत्रात सध्याच्या राज्यकर्त्यांकडून सर्वांत दुर्लक्षित क्षेत्र झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कापूस, सोयाबीन यासोबतच संत्रा उत्पादकांसाठी
देखील दिलासादायक धोरण राबविण्यात सरकार अपयशी ठरले, असल्याचे ते म्हणाले.