अहिल्यानगर
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘रब्बी हंगाम सन-२०२५-२६’ साठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या ५ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकांच्या उत्पादन वाढीसाठी विविध प्रयोग करणाऱ्या आणि भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
*स्पर्धेचे स्वरूप आणि बक्षिसे :* स्पर्धेचा निकाल तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर जाहीर केला जाईल.
*तिन्ही स्तरांवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी बक्षिसांचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.
*तालुका पातळी:- प्रथम- ५,००० रु., द्वितीय- ३,००० रु., तृतीय- २,००० रु.
*जिल्हा पातळी:- प्रथम- १०,००० रु., द्वितीय- ७,००० रु., तृतीय- ५,००० रु.
*राज्य पातळी:- प्रथम- ५०,००० रु., द्वितीय- ४०,००० रु., तृतीय- ३०,००० रु.
सहभागाचे निकष व शुल्क:-
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक असून, संबंधित पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे अनिवार्य आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल.
प्रवेश शुल्क हे पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये तर आदिवासी गटासाठी १५० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
*आवश्यक कागदपत्रे:-
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ), प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२ व ८/अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), घोषित क्षेत्राचा नकाशा आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन उत्पादन वाढीस हातभार लावावा, असे आवाहन श्री. बोराळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.


