नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक, सोनई,चांदा,घोडेगाव ह्या मंडळाचा २५ टक्के अग्रीम आणि उर्वरित पीक विमा नुकसान भरपाई तसेच कापूस तूर सोयाबीन व इतर खरीप २०२३-२४ चे विमा रक्कम नुकसान भरपाई पासून वंचित ठेवल्याने प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित जाऊन जिल्हाधिकाऱ्यां निवेदन दिले आहे.नुकसान भरपाई न मिळाल्यास १५ मार्च नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, नेवासा बुद्रुक,सोनई,चांदा,घोडेगाव या मंडळाचा खरीप २०२३-२०२४ सोयाबीन, कापूस, तूर, मुग व इतर पिकांचा अदयाप पर्यंत नुकसानी पोटी विमा मिळालेला नाही. पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत परिसरातील शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे सदर पिकांचे विमा उतरविलेला होता. वरील सर्व मंडळांमध्ये १२ ऑगस्ट २०२३ ते ६ सप्टेंबर २०२३ असा पावसाचा खंड पडलेला आहे. त्याप्रमाणे शासकीय नोंद देखील आहे. विमा कंपनीच्या नियमावलीनुसार भरपाई मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु सदर विमा कंपनीचे अधिकारी यांचेकडून शासकीय कार्यालयाकडून त्या प्रकारची अधिसूचना मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी २५ टक्के अग्रिम विमा रकमेपासून वंचित राहिलेले आहेत.
सदर अधिसूचना विमा कंपनीला न मिळणे हे संपूर्णपणे कृषी विभाग आणि तहसील तथा जिल्हाधिकारी कार्यालयाचा दप्तर दिरंगाई पणा आहे. सदरच्या गहाळ कारभाराचा सर्व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. अगोदरच दुष्काळ ग्रस्त परिस्थिती, कोणत्याही शेती मालाला भाव नसणे हयामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये विम्याची नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे हि बाब शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाने गांभीर्याने घेतलेली आहे.सदर विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर न आल्यास शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष १५ मार्च नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शेतकरी समवेत साखळी उपोषण करणार आहे याची नोंद घ्यावी.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. बोराळे यांना समक्ष बोलावून घेतले व तक्रार निवेदनातील तथ्य तांत्रिक बाबीवर कृषी विभागाचा बेजबाबदार धोरणावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या परखड शब्दात सूचना केल्या.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे, शेतकरी संघटनेचे अहमदनगर उपजिल्हाध्यक्ष हरीपप्पा तुवर
डॉ.रोहित कुलकर्णी, प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, प्रहार रुग्णसेवक नयन पुजारी, नचिकेत कुलकर्णी, बाळासाहेब मतकर, जालिंदर विधाटे, मुसा शेख, तुकाराम घोगरे, नवनाथ क्षीरसागर, योगेश पवार, भगवान शेळके, अशोक तूवर व चारही मंडळातून आलेले शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.