अहिल्यानगर
जलसंधारणाच्या कामामुळे शाश्वत पाणी उपलब्धता असलेले नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजार यंदा पाऊस कमी झाल्याने शेतीसाठी वापरावयाच्या पाण्यात कपात करणार आहे. कमीतकमी पाण्यात शेती फुलवण्याचे नवे आव्हान यंदा ग्रामस्थांनी स्वीकारले आहे. दरम्यान, यंदा २ कोटी ८२ लाख लिटर पाणी राखून ठेवले जाणार आहे.
हिवरे बाजार गावच्या यंदाच्या म्हणजे २०२४- २५च्या जल अंदाजपत्रकातून पावसाच्या पाण्याचा ताळेबंद नुकताच मांडला गेला व तो ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. या ताळेबंदानुसार आता पुढील पावसाळ्या पर्यंत पाणी जपून वापरण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
आदर्श गाव हिवरे बाजार मध्ये नवरात्र उत्सवानिमित्ताने ८ व्या माळेच्या दिवशी मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन २०२४-२५चा पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. नवरात्र उत्सवात पाण्याचा ताळेबंद सादर करण्याचे गावाचे हे २० वे वर्षे आहे. यावेळी आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, सरपंच विमल ठाणगे, सोसायटीचे अध्यक्ष छबुराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर उपस्थित होते. पद्मश्री पवार यांनी पाण्याच्या ताळेबंदाचे
सविस्तर वाचन केले. ते म्हणाले, सन १९९५ पासून आदर्श गाव हिवरे बाजार येथे पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकाचे नियोजन करीत असून त्यावेळेस फक्त १ पर्जन्यमापक होते. परंतु २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसविल्यामुळे अचूक पाण्याचा ताळेबंद येऊ लागला. यावर्षीच्या पाण्याच्या ताळेबंदातील मुख्य निरीक्षणे अशी यावर्षी २४ दिवसांत एकूण ४९१ मी.मी. पाऊस झाला असून त्यातून ४७९.६३ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले. त्यापैकी गावाच्या वापरासाठी ३२४.१७ कोटी लिटर पाणी उपलब्ध असून गावाच्या अन्य विविध वापरासाठी वार्षिक गरज ३२१.३५ कोटी लिटर आवश्यक असून त्यात लोकसंख्या व जनावरे यांना पिण्यासाठी आवश्यक ७.७१ कोटी लिटर, शेतीसाठी ३०७.१६ कोटी लिटर व इतर वापरासाठी ६.४८ कोटी लिटर अशी गरज आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून उन्हाळी सिंचन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यात फक्त जनावरांचा चारा व फळबाग जगविणे एवढेच उद्दिष्ट ठेवून भविष्यासाठी २.८२ कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे.