नेवासा
अहिल्यानगर जिल्ह्यात विशेषत: नेवासा, शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, राहता तालुक्यात वादळी वाऱ्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले असल्याने सदर पिक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला मिळवून द्या अशी मागणी गट शिवसेना युवा नेते अभिजीत पोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दि.१३ जून रोजी शिंदे गट शिवसेना युवा नेते अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वातील शिवसैनिकांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना भेटून झालेल्या वादळीवारा व अतिवृष्टीने शेती नुकसानी बाबत चर्चा करून निवेदन दिले. कृष्णा सातपुते, संजय वाघ, शिवाजी आगळे, गणेश घुणे, रमेश भालके, गणेश मेहेत्रे, गणेश जामदार, रोहन साळवे हे शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
दि.१० जून पासून अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा,शेवगाव,पाथर्डी, श्रीरामपूर, राहता,राहुरी, पारनेर या तालुक्यात वादळी वारा व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे, फळबागांचे, शेतातील सोलर पॅनलचे, जनावरांचे गोठ्यांचे व शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठे नुकसान होऊन घरांची छपरे उडून गेली आहेत.केळी,आंबा,डाळिंब अशा अनेक फळबागांचे देखील मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असल्याचे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.तसेच पंचनामे जरूर करा परंतु लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळवून द्या असे आवाहन श्री.पोटे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना केले.
यावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना बोलावून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे अभिजीत पोटे यांनी सांगितले.