Wednesday, February 11, 2026

भोजापूर चारीच्या विस्तारीकरणामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

शिर्डी/प्रतिनिधी

भोजापूर चारीच्या विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे. दमणगंगा – वैतरणा – गोदावरी नदीजोड प्रकल्पात या चारीचा समावेश झाल्याने लवकरच या भागाचा पाणी प्रश्न सुटणार आहे, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

भोजापूर चारीला तब्बल चाळीस वर्षांनंतर पाणी मिळवून देण्यात यश आले असून, यानिमित्ताने संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे जलपूजन समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ.सोनल शहाणे, जलसंधारण विभागाचे अभियंता हरीभाऊ गीते, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तसेच लाभक्षेत्रातील शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते ‌.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, चारीच्या रखडलेल्या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे चारीचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. चारी आता जलसंपदा विभागाकडे वर्ग झाल्यामुळे भविष्यातील कामांना गती मिळणार आहे.

याशिवाय, चारीच्या विस्तारीकरणाची मागणी लक्षात घेऊन ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याला लवकरच अंतिम मंजुरी मिळेल. या प्रस्तावांतर्गत पाणी वाहतुकीची कार्यक्षमता वाढविणे, पूर नियंत्रण, तसेच अधिक क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होईल.
भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा – वैतरणा – गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ३३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून, लवकरच अंमलबजावणी सुरू होणार आहे.
भविष्यात साकूर व पंचक्रोशीतील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्यात येत असून, त्याचाही प्रारंभ लवकरच करण्यात येईल,असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
आमदार अमोल खताळ यांनी ही मनोगत व्यक्त केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!