नेवासा/प्रतिनिधी
रस्त्यावरील बेघर, निराधार आणि मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहिलेल्या सामाजिक कार्यकर्ते, तसेच मानवी तस्करीच्या विळख्यात अडकलेल्या ११४ आदिवासी कुटुंबांची मुक्तता करून त्यांच्या ४८ बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे दिलीप वसंत गुंजाळ यांना पुष्पा नाथानी पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील रेलफोर फाउंडेशन कडून हा पुरस्कार देण्यात आला. १० लाख रुपये पारितोषिक व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रेलफोर फाउंडेशनचे संचालक दीपक नाथानी व सीएसआर प्रमुख नितीन घोडके यांच्या हस्ते गुंजाळ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नाथानी परिवार उपस्थित होता.
मूळचे नेवासा तालुक्यातील कारेगाव येथील रहिवाशी असलेले श्री.दिलीप गुंजाळ यांनी स्थापन केलेले श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ हे अनेक वर्षांपासून समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून आरणगाव (ता.नगर) येथे सुरू असलेल्या मानवसेवा प्रकल्पाचे माध्यमातून रस्त्यावरील बेघर, निराधार,मानसिक आजारग्रस्त, तसेच समाजाने विसरलेल्या व्यक्तींना अन्न, वस्त्र, औषधोपचार, निवारा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला जात आहे.


