Wednesday, February 11, 2026

खरीप २०२५ मधील पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा: झाला हा निर्णय?

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: खरीप २०२५ मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादकतेची माहिती राज्याने केंद्र सरकारला दिली आहे. केंद्राच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून, जानेवारी महिन्यातच सोयाबीनसह प्रमुख पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल.

परंतु कापूस आणि तुरीच्या विम्यासाठी एप्रिलही उजाडू शकतो, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.राज्य सरकारने यंदा खरीप आणि रब्बी हंगामात सुधारित पीकविमा योजना राबवली. सुधारित योजनेत पेरणीच न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान हे विमा भरपाईचे ट्रिगर काढून टाकले आहेत.

यंदाच्या खरीप हंगामात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. पण यंदा पंचनामे न करता पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आधारे भरपाई मिळणार आहे. त्यामुळे विमा भरपाई गेल्या वर्षीपेक्षा कमीच मिळणार आहे.खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्याची माहिती राज्याच्या कृषी विभागाने केंद्राकडे पाठवली आहे. तांत्रिक उत्पादकतेचीही माहिती दिली आहे.

म्हणजेच खरिपातील पिकांच्या विमा भरपाईसाठी आवश्यक सर्व माहिती राज्याकडून केंद्राला देण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना देय विमा भरपाईची रक्कम निश्चित होईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच विमा भरपाई जमा करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया जानेवारी महिन्यातच पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

विमा योजनेत बदल झाल्याने यंदा कंपन्यांना विम्याचा हप्ता गेल्या वर्षीपेक्षा कमी मिळाला. यंदा खरीप विम्यापोटी कंपन्यांना २४०० कोटी रुपयांचा हप्ता मिळणार आहे. कंपन्यांना राज्याचा हिस्सा देण्यासाठी आर्थिक तरतूद आधीच करून ठेवण्यात आली आहे. विमा भरपाईची रक्कम निश्चित झाल्यानंतर कंपन्यांना लगेच हप्ता देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

कापूस, तुरीचा विमा कधी?:जानेवारीत सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मक्यासह इतर खरीप पिकांची विमा भरपाई जानेवारीत मिळेल. मात्र कापूस आणि तुरीचे पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यात प्रयोग पूर्ण होतील. त्यानंतर माहिती अपलोड करून विमा भरपाई निश्चित करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यात कापूस आणि तुरीची विमा भरपाई मिळेल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार ५०० रुपये विमा भरपाई मिळेल, असे सांगितले होते. पण पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही. काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक पातळीवर मोठे नुकसान झाले असले तरी यंदा वैयक्तिक पंचनामे झाले नाहीत.

मंडल पातळीवर पीक कापणी प्रयोग होऊन मंडल पातळीवर नुकसानीची पातळी ठरणार आहे. त्यानुसार विमा भरपाई मिळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले विमा भरपाईचे आश्वासन फोल ठरण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!