माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डॉ. तनपुरे कारखान्याबाबत खा. डॉ. सूजय विखे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होतेे. डॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दि. 26 जून 2021 रोजी संपलेली आहे. या संचालक मंडळाला दि. 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
कारखान्याच्या गळीत हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. कारखाना सुरू करण्यासाठी किमान 10 कोटी रुपये खर्च येतो. सध्या कोणतीही बँक कारखान्याला एकही रुपया कर्ज देत नसून आतापर्यंत कारखाना सुरू करण्यासाठी मी वैयक्तीक घरातून 15 कोटी रुपये खर्च केला आहे. प्रत्येकवेळेस कारखाना सुरू करण्यासाठी पैसे आणायचे कोठून? असा सवाल त्यांनी केला.
कारखाना गळीत हंगाम सुरू झाल्यानंत्तर पहिले दोन महिने कारखान्याला अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे कारखाना सुरळीत चालला नाही. मग कारखाना सुरळीत चालविण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न त्यांनी विचारला. दोन महिन्यानंत्तर कारखाना तोच, सर्व मशिनरी तीच, मग कारखाना नंतर सुरळीत चालू झाला कसा? प्रारंभापासून कारखाना
सुरळीत चालला असता तर आज कोणालाही एक रुपयाचीही भीक मागण्याची गरज पडली नसती. माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी तीन वर्ष कारखाना सुरळीत चालण्यासाठी मोठी मदत केली आहे. मात्र, आता बँक कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य करीत नाही. कारखाना सुरळीत चालू करण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च आहे.
तो खर्च आज मी केला आणि ऐनवेळेस राज्य शासनाने कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली तर हे पैसे परत कोण देणार? त्यासाठी राज्य सरकारने कारखाना चालविण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली तर शेतकरी, कामगारांसाठी हा कारखाना एकाच महिन्यात सुरू करण्यास वचनबद्ध आहे. कारखान्याच्या सभासदांचे काही देणे बाकी आहे. तेही देणे मी देणार आहे.
शेतकर्यांकडे कारखान्याची आगाऊ रक्कम मुद्दल व व्याजासह 21 कोटी रुपयांच्या दरम्यान असून या रकमेतून शेतकर्यांनी मुद्दल भरली तरी त्यांना व्याज माफ करण्याचा संचालक मंडळाचा निर्णय घेण्यात येईल. हा पैसा वसूल झाला तर कोणत्याही बँकेचे कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.
डॉ. तनपुरे कारखान्याचे 28 हजार सभासद असून त्यापैकी 22 ते 23 हजार शेतकर्यांची शेअर्स रक्कम अद्यापही पूर्ण नाही. त्या सभासदांनी शेअर्स रक्कम पूर्ण करून कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.