नेवासा
भक्ती करण्यात जो जन्मभर तत्पर असतो. त्याला मुक्ती नक्की मिळते. सतत नामाचा उच्चार करणे म्हणजेच सेवा होय. आणि सेवेमधे अखंडता असते. हे व्रत स्विकारतात ते संत असतात. ज्ञानेश्वर महाराज हे अनाथांचे माय बनले. ज्यांना जग नाकारतं त्यांना संत स्विकारत असतात असे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले.
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे आयोजित राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.
अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांनी पुष्पहार घालून ढोक महाराज यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे मार्गदर्शक समाधान महाराज शर्मा, नेवासा ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त देविदास महाराज म्हस्के, त्रिवेणीश्वर संस्थानचे रमेशानंदगिरी महाराज, खडेश्वरी संस्थानचे गणेशानंदगिरी महाराज, रामनाथ महाराज पवार, सुभाष महाराज देशमुख, जयाताई गडाख, अड.देसाई देशमुख, शिवाजी पाठक, जनार्दन शेळके, प्रा.नारायण म्हस्के, दत्तात्रय पोटे, दादासाहेब पोटे, अझर शेख व्यासपिठावर उपस्थित होते.
रामराव महाराज ढोक पुढे म्हणाले की, देवगड व नेवासा तीर्थक्षेत्रांमधे किसनगिरी बाबा, बन्सी महाराज तांबे यांच्यासारखे महापुरुष संत होऊन गेले आहे. त्यांच्या परिसरात एवढा मोठा राज्यस्तरीय कीर्तन सोहळा पार पडत आहे. त्यामुळे शिरसगावकरांना ते नक्कीच आशीर्वाद देतील. ज्ञानेश्वर महाराज हे अनाथांचे माय बनले. ज्यांना जग नाकारतं त्यांना संत स्विकारत असतात. माय हा अंतकरणाचा ठाव घेणारा शब्द असल्याने तो प्रेमाने उच्चारला जातो. चांगल्या मनाने केलेला परमार्थ शुध्द होतो. अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंधाने हरिपाठ हा शास्त्र बनला आहे. भक्ती करण्यात जो जन्मभर तत्पर असतो. त्याला मुक्ती नक्की मिळते. सतत नामाचा उच्चार करणे म्हणजेच सेवा होय. आणि सेवेमधे अखंडता असते. हे व्रत स्विकारतात ते संत असतात. हरिनाम घेतल्याने पापाची निवृत्ती तर होतेच परंतु त्याच्या पुण्याची गणना करता येत नाही ही नामाची ताकद आहे. संसार अजिबात वाईट नाही. कारण या गृहस्थ आश्रमावर इतर तीनही आश्रम अवलंबून आहेत. म्हणून हा श्रेष्ठ सांगितला आहे, मात्र संसारिकांनी संसाराच्या आहारी जाणं वाईट असल्याचे ते म्हणाले.
कीर्तन महोत्सवाचे आयोजक प्रा. गणेश देशमुख यांनी उपस्थित संत महंतांचा सन्मान करुन आभार व्यक्त केले.


