कोपरगाव/प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील सर्व गटारीचे पाणी नदीपात्रात सोडणे बंद करावे अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठाण ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्री.ढाकणे यांनी म्हंटले आहे की, कोपरगाव शहरांमधून पवित्र अशी दक्षिणगंगा गोदावरी वाहते. गोदावरी नदीमध्ये अंघोळ केल्यानंतर सात जन्माचं पाप नष्ट होतं अशी आख्यायिका आहे. गोदावरी नदीच्या कडेला किमान १४ पौराणिक शिवलिंग आहेत. आजूबाजूच्या चाळीस-पन्नास किलोमीटर पर्यंत गावची यात्रा असेल तर त्या गावच्या ग्रामदैवताला आंघोळीसाठी गोदावरी नदी पात्रातून पाणी कावडीने नेले जाते. पूर्वी साईबाबाला आंघोळीसाठी गोदावरी नदीतुन पाणी जायचे अशी साई चरित्रामध्ये नोंद आढळते. गुरु शुक्राचार्य महाराज वर्षामधून सहा वेळा गोदावरी नदीच्या भेटीला येऊन अंघोळ करतात. अशा प्रकारे गोदावरी नदीला धार्मिक, महत्व आहे.
हे सर्व मी का सांगत आहे तर आपल्या गोदावरी नदीला एक अन्य साधारण महत्त्व आहे. पण आता सध्या तिच्यामध्ये हनुमान नगर ते मोठा पूल, साई सिटी ते मोठा पूल या भागातील सर्व मलमूत्र-केमिकल युक्त गटारी नगरपरिषदेने सोडले आहे. यामुळे नदीच्या पाण्यामध्ये अमोनिया मुळे कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले आहे. ऑक्सीजन भेटत नसल्यामुळे नदीच्या पाण्यामधील जीवसृष्टी नष्ट झाली आहे, लाखो मासे मरून पडतात. याला हे सर्व गटारीचे पाणी जबाबदार आहे. तसेच २०२७ मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होत असुन नाशिक बरोबरच कोपरगाव येथुन वहाणाऱ्या गोदावरी नदीत बरेच संत महात्म, भाविक स्नानासाठी येतील. त्या सर्वांनी अशा मलमुत्र पाण्यात स्नान करणे योग्य नाही. मी नगर परिषदेला विनंती करतो आपण लवकरात लवकर या सर्व गटारीचे पाणी गोदावरी नदी पात्रामध्ये सोडणे बंद करावे अन्यथा आम्हाला कोर्टामध्ये दाद मागावी लागेल. २०२२ मध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे पण याबाबद लेखी तक्रार केलेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे,पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नाशिक विभाग यांना ही या निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.


