श्रीरामपूर ( प्रतिनिधी ): तालुक्यातील माळवाडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकळीभान येथे झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धेत खो-खो मध्ये मोठा गट मुली, लहान गट मुली तसेच कबड्डीत मोठा गट मुली व लहान गट मुलींनी प्रथम क्रमांक पटकावून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी केली आहे. ईश्वरी आसने लांब उडी मोठा गट प्रथम, श्रावणी खाजेकर गोळा फेक मोठा गट द्वितीय, प्रसन्ना गोरे मोठा गट थाळीफेक द्वितीय, पवन मोरे मोठा गट गोळा फेक तृतीय, ईश्वरी आसने १०० मीटर धावणे मोठा गट प्रथम, विराज शिंदे थाळीफेक मोठा गट द्वितीय, समर्थ शिंदे उंच उडी मोठा गट द्वितीय, ईश्वरी आसने उंच उडी मोठा गट द्वितीय, समर्थ शिंदे १०० मीटर धावणे मोठा गट द्वितीय, समर्थ शिंदे मोठा गट लांब उडी द्वितीय, निधी गाढे ५० मीटर धावणे लहान गट तृतीय क्रमांक मिळवून या सर्व विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धव शेळके, उपाध्यक्ष पत्रकार संदीप आसने, सदस्या स्वाती आसने, सुरभी दांगट, मुख्याध्यापक मुंतोडे सर, पाचपिंड सर, धोंगडे सर, तोडमल मॅडम, शेळके सर, बोर्डे मॅडम, साळवे मॅडम, बोबडे मॅडम, शोयब पठाण यांसह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. भामाठाण शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, उद्धव शेळके, पत्रकार संदीप आसने यांनी मनोगत व्यक्त केले.
पत्रकार संदीप आसने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “माळवाडगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे शाळेच्या व गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे. पुढील तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांतही अशीच कामगिरी होईल अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षक वृंदांचे आणि पालकांचे योगदान अतुलनीय आहे.उद्धव शेळके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करत, इतर विद्यार्थ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी पाचपिंड सर यांनी आभार मानले.