भेंडा/नेवासा
महात्मा जोतीराव फुले यांनी १८६९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘कुळवाडी भूषण’ (शेतकऱ्यांचा, रयतेचा कैवारी) असा गौरवपूर्ण उल्लेख करत पहिला प्रदीर्घ पोवाडा लिहिला. शिवरायांचे एक सर्वसमावेशक, रयतेचा राजा म्हणून ऐतिहासिक दर्शन घडवण्यासाठी महात्मा फुलेंनी हा पोवाडा लिहिला, असे प्रतिपादन अड. पांडुरंग औताडे यांनी केले.
भेंडा येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने गुरुवार दि. १९ रोजी सायंकाळी ६ वाजता भेंडा बसस्थानक चौकात आयोजित शिवजयंती उत्सवात व्याख्यान देताना अड. पांडुरंग औताडे बोलत होते. साहेबराव महाराज गव्हाणे अध्यक्षस्थानी होते.
दत्तात्रय काळे, अशोकराव मिसाळ, गणेश गव्हाणे, डॉ. शिवाजी शिंदे, राजेंद्र चिंधे, वैभव नवले, बापूसाहेब नजन, नामदेव शिंदे, बाबासाहेब गव्हाणे, देवेंद्र काळे, सोमनाथ गव्हाणे, अण्णासाहेब गव्हाणे, शिवाजी तागड, शिवाजी फुलारी, अण्णासाहेब शिंदे, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत करंजे, चांगदेव जगताप, किशोर मिसाळ, अड. रविंद्र गव्हाणे, संदीप गव्हाणे, स्वप्निल गरड, सूरज गव्हाणे, विकास सालुंके, विशाल शिंदे, कृष्णा गव्हाणे, ज्ञानेश्वर कडू, हर्षल सानप आदी उपस्थित होते.
अड.औताडे पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ हा परकीय सत्तांच्या संघर्षाचा, राजकीय अस्थिरतेचा आणि अन्यायाचा होता. शहाजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची परंपरा आणि राजमाता जिजाऊंच्या संस्कारांतून स्वराज्याची बीजे रोवली गेली. शिवनेरी किल्ल्यावर झालेला जन्म हा केवळ एका राजाचा नव्हे, तर स्वराज्याच्या संकल्पनेचा प्रारंभ होता.
शिवजन्मानंतर बालपणात जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली धर्म, शौर्य आणि न्यायाचे संस्कार झाले. तोरणा किल्ल्याच्या जिंकण्यापासून स्वराज्य विस्ताराला सुरुवात झाली. अफजलखानवध, शाहिस्तेखानावर कारवाई, पुरंदरचा तह, आग्रा भेट व सुटका, सिंहगडाचा पराक्रम आणि रायगडावरील राज्याभिषेक या सर्व घटनांनी स्वराज्य अधिक बळकट झाले. किल्ल्यांची उभारणी, आरमाराची निर्मिती, शिस्तबद्ध लष्कर आणि सक्षम प्रशासन यांमुळे राज्यकारभार सुस्थितीत आला. अखेर रायगडावर देहावसान होईपर्यंत त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी अखंड प्रयत्न केले.राजा शिवछत्रपती यांची नीती ही जाती-धर्मात भेदभाव निर्माण करणारी नव्हती, तर सर्व समाजघटकांना एकत्र आणणारी आणि प्रखर राष्ट्रभावना जागवणारी होती. त्यांनी तयार सरदारांवर अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वातून सेनापती घडवले आणि सामान्य मावळ्यांना नेतृत्व दिले.
आजच्या परिस्थितीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, केवळ शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन किंवा त्यांचा फोटो वापरून प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्या विचारांची आणि लोकाभिमुख तत्त्वांची अंमलबजावणी राज्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केली पाहिजे. अन्यथा त्यांच्या नावाचा वापर केवळ राजकीय हेतूसाठी केला जातो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तरुणांनी घोषणांपेक्षा विचारांचा स्वीकार करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिवतेज गव्हाणे या बालकाने शिव पोवाडा सादर केला तर अभिज्ञा गव्हाणे हिने मनोगत व्यक्त केले.
शिवजयंती उत्सव समितीचे संदीप गव्हाणे, विकास साळुंके, चंद्रकांत चौधरी, स्वप्निल गरड, नितीन नवले, महेश नवले, ज्ञानेश्वर कडू,संदीप चिंधे, महेश साबळे, आनिकेत साबळे, नाना शिंदे, नाना गव्हाणे प्रकाश नवले, बाळासाहेब गव्हाणे,महेश फुलारी, सूरज गव्हाणे,संदीप गोरे, अनिल लिपने, हर्षद सानप, संतोष गव्हाणे, दत्ता गव्हाणे, ऋषिकेश तागड या भेंडा बुद्रुक व भेंडा खुर्द येथील तरुण युवकांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
रामभाऊ गवळी यांनी प्रास्ताविक केले.राजेंद्र केकाण व विमल गवळी यांनी सूत्रसंचालन केले.संदीप गव्हाणे यांनी आभार मानले.


