अहिल्यानगर
सत्याची आणि वैचारिक-विवेकी विचारांची चळवळ असल्याने इतर कोणत्याही संघटने पेक्षा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटने बद्दल आणि कार्यकर्त्यांविषयी समाजमनामध्ये आदराची भावना आहे,असे प्रतिपदान
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष माधव बावगे यांनी केले.
गुरुवार दि. १२ जून रोजी दुपारी ३ वाजता
अहिल्यानगर येथे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भारुळे यांच्या निवासस्थानी श्री.माधव बावगे यांचे प्रमुख उपस्थितित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अहिल्यानगर जिल्हा बैठक संपन्न झाली ,त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.राज्य सल्लागार कॉ.बाबा आरगडे, राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे, बुवाबाजी संघर्ष विभाग राज्य कार्यवाह अँड.रंजना गवांदे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भारुळे,जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा व देवदत्त साळवे, निधी संकलन कार्यवाह प्रा अशोक गवांदे, जिल्हा सोशल मीडिया कार्यवाह सुखदेव फुलारी, महिला सहभाग जिल्हा कार्यवाह छायाताई बंगाळ, बुवाबाजी संघर्ष विभाग जिल्हा कार्यवाह शशिकांत गायकवाड,संजय वाल्हेकर, अरविंद सोनटक्के, नगर शहराध्यक्ष भारतभुषण भागवत,शहर युवा कार्यकर्ता ललित भारुळे,शहर महिला विभाग कार्यवाह भावना भारुळे, गोरक्षनाथ रिंधे,संभाजीराव माळवदे आदि या बैठकीस उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र अंनिसचे निर्वाचित अध्यक्ष माधव बावगे, नवनिर्वाचित राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, बुवाबाजी संघर्ष विभाग राज्य कार्यवाह अॅड.रंजना गवांदे यांचेसह गौरव ग्रंथ प्रकाशनानिमित्त कॉ.बाबा आरगडे व स्व.सोपानराव दरंदले पत्रकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुखदेव फुलारी यांचा जिल्हा अंनिसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राज्य अध्यक्ष माधव बावगे पुढे म्हणाले की, नगर जिल्हा हा पूरोगामी परिवर्तनवादी विचारसरणीचा जिल्हा आहे, या जिल्ह्यात संघर्षातून संघटना तयार झालेली आहे. अंनिस ही कृतीशील, विवेक विचारांची पेरणी करणारी आहे.आजकाल लोकांना काय बरं वाटतं यासाठी आपले विचार सोडून खरं बोलण्यापेक्षा बरं बोलण्याची सवय लागलेली आहे. अंनिस ही देवाधर्माच्या विरोधीतील चळवळ नाही.तर याबाबत भारतीय राज्य घटनेत जे नमूद आहे त्याला अनुसरून,तटस्थतेची भूमिका घेऊन , सामाजिक परिवर्तनाचे काम करणारी संघटना आहे. शोषण, फसवणूक व दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार,प्रसार व अंगीकार करणे,धर्माचीविधायक ,कृतिशील ,कालसुसंगत चिकित्सा करणे,संत समाज सुधारकांचा वारसा व संविधानाचा मूल्याशय कृतिशील करणे आणि व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे या पंचसूत्रीवर संघटना काम करते.
शाखा कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी व राज्यस्तर अशी अंनिसची संघटनात्मक संरचना आहे. शाखा सक्षम होण्यासाठी शाखांच्या नियमित बैठका घ्याव्यात, सभासद नोंदणी करावी,शाखा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,वैचारिक पुस्तकांचे वाचन करून आपली वैचारिक बैठक पक्की करावी आणि चिकित्सक वृत्ती बाळगावी अशी अपेक्षा बावगे यांनी व्यक्त केली.
प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे म्हणाले की, कॉम्रेड बाबा आरगडे गौरव ग्रंथा मधून आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल. अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये काम करण्यास मोठी संधी आहे. काम सुरूच आहे, परंतु वेग वाढवण्याची गरज आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांनी शाखा भेटी द्याव्यात. कार्यकर्त्यांना आपल्या जबाबदाऱ्या आणि मर्यादा काय आहेत हे माहिती व्हावे,विवेकी विचारांचे वारस तयार व्हावेत यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरे आयोजित करणे आवश्यक आहेत.राज्य संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र उभी करण्याचा मानस आहे.
अॅड.रंजना गवांदे म्हणाल्या की, अहिल्यानगर जिल्हा शाखेचे कार्य उत्तम आहे, एकमेकांना ताकद-प्रोत्साहन देत जिल्ह्याचे काम सर्वांच्या सहकार्याने आणखी पुढे नेऊ.
कॉ.बाबा आरगडे यांनी कार्यकर्त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन करावे,स्वत:करिता नियमावली तयार करावी ,असे सूचविले.
यावेळी नगर जिल्हा नगर शहर, संगमनेर, नेवासा,भेंडा, श्रीरामपूर, पाथर्डी, कान्हुर पठार शाख़ेंच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या शाखेचा अहवाल सादर केला.