Saturday, February 21, 2026

जिल्हा बँकेच्या इमारतीच्या नूतनीकरणातून कामकाजात वेग वाढविण्याचा संकल्प साकार-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर, दि. २१

सहकार चळवळ हा सामाजिक व आर्थिक विकासाचा भक्कम पाया आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचतगट, लघुउद्योजक व सर्वसामान्य कुटुंबांसाठी आर्थिक आधारस्तंभ आहे. या इमारतीच्या नूतनीकरणातून केवळ भौतिक सुविधा सुधारल्या नसून बँकेच्या कामकाजात गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेग वाढविण्याचा संकल्प साकार झाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्टेशन रोड शाखा व मुख्य कार्यालय इमारतीचे नूतनीकरण व ‘ई-लॉबी ‘चे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिकाताई राजळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार नरेंद्र घुले, अक्षय कर्डिले, बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब लक्ष्मण वर्पे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सूरवसे आदी उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री.पाटील म्हणाले, “मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उत्कर्षामध्ये अनेकांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील अग्रगण्य बँकांमध्ये अहिल्यानगर येथील या बँकेची गणना केली जाते. सध्या २८७ शाखांच्या माध्यमातून बँक लाखो ग्राहकांशी जोडली गेली आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज, अल्पमुदतीचे कर्ज तसेच विविध आर्थिक सुविधा देत बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम आधार देत आहे. खासगी बँकांच्या बरोबरीने आधुनिकीकरण करून बँकेने जिल्ह्याच्या वैभवात मोलाची भर घातली आहे.” स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी पाहिलेले बँकेच्या उत्कर्षाचे स्वप्न आज साकार होत असून त्यांची उणीव सदैव जाणवत राहील, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक
जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज बनली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा आज सर्वच क्षेत्रांमध्ये प्रभावी वापर होत असून पारंपरिक शेतीतही बदल घडवून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक आहे. तरुणांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शेती समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा व जिल्ह्यातील ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच, सहकार चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी केंद्र शासनाने सहकार मंत्रालयाची स्थापना केली असून केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून या क्षेत्राला न्याय देण्याचे कार्य सुरू आहे. सहकारी सोसायट्या केवळ कर्जपुरवठ्यापुरत्या मर्यादित न राहता शासनाच्या ५१ विविध योजनांचा समावेश करून त्यांना अधिक सक्षम व सर्वसमावेशक बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

*नूतनीकृत इमारतीमधून ग्राहकाभिमुख सेवा देण्याची बांधिलकी अधिक दृढ-डॉ. विखे

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “जिल्ह्याची सहकार परंपरा समृद्ध असून, या बँकेने अनेक वर्षे ग्रामीण भागाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. नूतनीकरण झालेली ही इमारत म्हणजे नव्या युगाची सुरुवात असून, ग्राहकाभिमुख सेवा देण्याची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी व सहकारी कारखानदारीच्या उत्कर्षासाठी बँक सातत्याने काम करत आहे. पारदर्शकता व शिस्त पाळत सर्वसामान्यांची कामधेनू म्हणून ही बँक पुढे आली आहे.”

“स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी बँकेचा कायापालट करण्याचे जे स्वप्न पाहिले होते, त्याची पूर्तता आज या निमित्ताने होत आहे. जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नांमुळे आज त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. देशपातळीवर पहिले सहकार मंत्रालय स्थापन होऊन सहकार चळवळीला एक नवे रूप मिळत आहे. ही चळवळ निकोप वाढीस लागण्याच्या दृष्टीने व्यापक काम करण्याची गरज आहे. बँकांनी बचतगटांना अधिकाधिक कर्जपुरवठा करून महिलांना अधिक सक्षम करावे,” असे आवाहनही डॉ. विखे पाटील यांनी केले.

*चंद्रशेखर घुले पाटील…

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील म्हणाले , “बँकेच्या नूतनीकरणामुळे कामकाज अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होणार आहे. सध्या बँकेत ११ हजार २८७ कोटी रुपयांच्या ठेवी असून, या भक्कम आर्थिक पायावर बँक स्पर्धात्मक धोरण स्वीकारून पुढे जात आहे. डिजिटल पेमेंटची सुसज्ज व्यवस्था उभारण्यात येत असून, स्वतःचा ‘क्यूआर कोड’ असलेली बँक म्हणून लवकरच तिची ओळख निर्माण होईल.”

शेतकरी व ग्राहकांच्या सोयीसाठी अल्पमुदतीच्या कर्जाचे मध्यम मुदतीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास बँकेचे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, तसेच ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!