अहिल्यानगर/प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला या दुष्काळी व दुर्गम गावातील शेतकरी कुटुंबातील कु. ऋतुजा अशोक गायकवाड हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात १०६ वा क्रमांक मिळवत आयएएस पदासाठी निवड मिळवली.
ऋतुजाचे वडील अशोक गायकवाड यांना कलेक्टर व्हायचं होतं. मात्र साधनं कमी आणि परिस्थितीमुळे त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. “मी कलेक्टर होऊ शकलो नाही, मात्र कलेक्टरचा बाप नक्की होईन,” हा ध्यास घेऊन ऋतुजाला शिकविले आणि ऋतुजाने ही जिद्दीने आपल्या बापाचे स्वप्न पूर्ण केले.
ऋतुजा गायकवाड ही शेतकरी कुटुंबातील असून तिचे वडील अशोक गायकवाड यांनी मोठ्या कष्टातून डी.
एड. चे शिक्षण पूर्ण करून गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावली. ऋतुजानेही प्राथमिक शिक्षण याच जिल्हा परिषद शाळेत घेतले. ग्रामीण भागात शिक्षण घेत जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर तिने यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवत संगमनेर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.


