कोपरगाव/प्रतिनिधी
एकल महिला व बालकांसाठी उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल साऊ एकल महिला समितीच्या कोपरगाव तालुका समन्वयक व मुख्याध्यापिका संगीता अरविंद मालकर यांच्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर व मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते संगीता मालकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रभादेवी मुंबईत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.पुरस्कार मिळाल्याबद्दल मालकर यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जि.प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, समन्वयक अशोक कुटे, मिलिंदकुमार साळवे, प्रतिमा कुलकर्णी, बाळासाहेब जपे, प्रकाश जोंधळे, श्रीकांत बिडवे आदींनी अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या “महिला सन्मान पोर्टलचे” अनावरण व “सायबर वेलनेस कक्षाचे उद्घाटन यावेळी झाले.
आमदार मनीषा कायंदे, आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शहा,अपर पोलीस महासंचालक अश्वती दोर्जे, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मीनल जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोगाच्या “भरारी” या पुस्तकाचे व भित्तीपत्रकाचे अनावरण झाले.
महिला शक्तीच्या सोहळ्याच्या निमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासह बहुमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरवपूर्वक सन्मान करण्यात आला. ‘आत्मसन्मानाच्या वाटा’ या महिला आयोगाच्या पुस्तकाचे व भित्तीपत्राचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी आयोगाच्या कामकाजाची प्रशंसा करत सध्या आयोगाच्या मार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांना शुभेच्छा देताना “दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेहमी राज्यातील महिला भगिनींना सुरक्षा, शिक्षण, रोजगार आणि अधिकाधिक आर्थिक पाठबळ देण्यासाठी कार्यरत राहिले, या पुढील काळात आम्ही देखील महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला भगिनींसाठी वेगवेगळ्या योजना आणून त्यांचे सक्षमीकरण करण्याबाबत काम करत राहू”,अशी ग्वाही दिली.
महिला तक्रार निवारण पोर्टलच्या माध्यमातून महिलांच्या समस्या अधिक पारदर्शकतेने आणि परिणामकारकपणे सोडवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. महिला आयोगाच्या पोर्टलमुळे राज्यातल्या कोणत्याही महिलेला घरबसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. ही प्रणाली राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनशी जोडलेली असल्यामुळे महिलांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे.”,असे आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सांगितले.


