नेवासा/सुखदेव फुलारी
कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे मंगळवार दि.5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात भेंडा-वडाळ्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबद अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका सौ. मीना कल्याण मडके (वय ५५ वर्षे) ,सौ. निता अशोक डूरे (वय ५५ वर्षे) या त्यांचे वडाळा येथील मावस भाऊ अविनाश रामचंद्र काकडे (वय ५८ वर्ष), अभिषेक भाऊसाहेब मोटे (वय ३८ वर्षे),सौ.मोनिका अभिषेक मोटे ( वय ३२ वर्षे), आराध्या अभिषेक मोटे (वय १३ वर्षे), वेदांत अभिषेक मोटे (वय ३ वर्षे) व सलाबतपूर येथील सौ. मनीषा रामदास कोहक (वय ५० वर्षे) हे सर्व नातेवाईक मंगळवार दि. ५ मे रोजी पहाटे वडाळा येथून स्कार्पिओ गाडीने आजारी असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी मुबंई येथे जात असताना सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास विठ्ठलवाडी-कल्याण-आहिल्यानगरला जाणारी बस आणि स्कॉर्पीओ गाडीची धडक बसल्याने हा अपघात झाला. विठ्ठलवाडी आगारातून कल्याण-अहिल्यानगरसाठी निघालेल्या एसटी बसची व स्कार्पिओ गाडीची मुरबाड ( जि.ठाणे) तालुक्यातील टोकावडे-वैशाखरे हद्दीत समोरासमोर जोराची धडक होऊन अपघात झाला.
या अपघातात भेंडा बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका सौ. मीना कल्याण मडके (वय ५५ वर्षे) व सौ.निता अशोक डूरे (वय ५५ वर्षे) ,वडाळा येथील अविनाश रामचंद्र काकडे (वय ५८ वर्ष) व अभिषेक भाऊसाहेब मोटे (वय ३८ वर्षे) यांचा मृत्यू झाला असून
सौ.मोनिका अभिषेक मोटे ( वय ३२ वर्षे), आराध्या अभिषेक मोटे (वय १३ वर्षे), वेदांत अभिषेक मोटे (वय ३ वर्षे) व सलाबतपूर येथील सौ. मनीषा रामदास कोहक (वय ५० वर्षे) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्यात मदत केली.जखमींवर अपघात स्थळानजीकच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
चार ही मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मीना मडके व डूरे यांचा भेंडा येथे तर अभिषेक मोटे व अविनाश काकडे यांच्या पार्थिवावर वडाळा येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जखमींवर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या चार जणांवर काळाने खडक पातल्याने भेंडा परिसरावर शोककळा पसरली आहे.


