नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या यंदाचे कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, डॉ. संदीप वासलेकर, प्रा. डॉ. रंगनाथ पठारे यांना जाहीर झाले आहेत. शनिवार दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
राज्यातील सामाजिक क्षेत्रात रचनात्मक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. राज्यातील मोजक्याच प्रतिष्ठेच्या
पुरस्कारांमध्ये याचा समावेश होतो. सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरणाचा सोहळा होणार आहे.
कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी राजीव खांडेकर हे भारतातील एक प्रख्यात मराठी पत्रकार, संपादक आणि मीडिया स्ट्रॅटेजिस्ट आहेत, अनुभवी पत्रकार आणि मीडिया लीडर आहेत. त्यांनी पत्रकारितेतील कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे विषय कव्हर केले आहेत. मराठी दैनिके आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये काम केलं आहे. पत्रकारितेत सुमारे ३० वर्षांचा त्यांना अनुभव आहे. पत्रकारितेत त्यांनी राजकीय विश्लेषण, सामाजिक समस्या, आणि महाराष्ट्रातील विविध घडामोडींवर विशेष विशेष कार्यक्रम कार्यक्र आणि रिपोर्टस् केले आहेत. विविध वृत्तपत्र इतर माध्यमांत त्यांच्या मतांचे लेख आणि चर्चा प्रकाशित झाल्या आहेत ज्यात ते माध्यमांची भाषा, जबाबदारी आणि सामाजिक भूमिका यावर भाष्य करतात.
डॉ.संदीप वासलेकर हे एक आंतरराष्ट्रीय विचारवंत, लेखक आणि सार्वजनिक धोरणांचे विश्लेषक आहेत. ते स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप या मुंबईस्थित थिंक टँकचे अध्यक्ष आहेत. जे जगभरातील सरकार आणि संस्था यांच्यासोबत धोरणात्मक संवाद आणि समाधान निर्मितीवर काम करते. त्यांनी तत्वज्ञान, राजकारण व अर्थशाखामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे तसेच मुंबई विद्यापीठातून एम कॉम पूर्ण केले आहे. २०११ मध्ये त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही मानद पदवी प्राप्त झालेली आहे. त्यांनी पाण्याच्या द्विपक्षीय समस्यांसाठी ब्लूपिस फ्रेमवर्क विकसित केला आहे, ज्याचे उद्दिष्ट पाण्याच्या संसाधनांसह शांतता आणि सहकार्य वाढवणे आहे. त्यांच्या अहवालांना यूकेच्या संसदेत आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील चर्चेत संदर्भ म्हणून वापरले गेले आहे. त्यांच्या लेखांची विविध पुस्तके जागतिक वाचकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठीतही ‘एका दिशेचा शोध’ सारखी लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत.
प्रा.डॉ.रंगनाथ पठारे हे साहित्यिक, लेखक आणि पत्रकार आहेत. त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि लेखनातून सामाजिक सांस्कृतिक विषयांचे प्रभावी विश्लेषण त्यांनी केले आहे. त्यांची
राज्य सरकारच्या अभिजात मराठी भाषा समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या समितीचे अध्यक्ष म्हणून अहवाल तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या समितीत साहित्यिक व विषयतज्ञांचा समावेश होता. प्रा.डॉ.रंगनाथ पठारे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला, जो मराठी साहित्य क्षेत्रातील एक प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार आहे
विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या अशा मान्यवरांच्या आयुष्याचा प्रवास हा जिद्दीचा व सातत्याचा असतो म्हणूनच तरुणांनी, नागरिकांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाचा लाभ व प्रेरणा घ्यावी असे आवाहन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.


