गुहा पत्रकार राहुल कोळसे:शेतक-यांच्या मागणीची दखल घेवून निळवंडे धरणातून २६ जानेवारी २०२६ रोजी सिंचनासाठी आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या आधिका-यांना दिल्या. निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी केलेली आहे
.विशेषतः राहुरी तालुक्यातील लाभक्षेत्रात येणा-या गावांमधून आवर्तन सोडावे ही मागणी प्रामुख्याने शेतक-यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून केलेली होती. पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी आवर्तानचे वेळापत्रक निश्चित करण्यास विभागाच्या अधिका-यांना सांगितले, त्यानुसार २६ जानेवारी २०२६ पासून हे आवर्तन सुरु करण्यात येणार असून, मागणीप्रमाणे शेवटच्या शेतक-याला पाण्याची उपलब्धता करण्याच्या सुचना त्यांनी विभागाच्या आधिका-यांना दिल्या आहेत.
दरम्यान राहुरी तालुक्यातील गावांसाठी निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी जिल्हा बँकेचे संचालक अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती.कर्डिले यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, निळवंडे धरणाचा उजवा पाट राहुरी तालुक्यातून जातो त्यामध्ये गुहा, गणेगाव निंभेरे, तुळापुर, कानडगाव, तांदुळनेर, सोनगाव सात्रळ, धानोरे, तांभेरे, वडनेर, कनगर, चिचंविहिरे आदि गावांना मोठ्या प्रमाणात पाटाच्या पाण्याचा फायदा होतो.
मागील वर्षी आपल्या माध्यमातून सर्व लाभार्थी गावातील ओढ्यावर असणारे बंधारे भरून वाहिले होते त्यामुळे आजपर्यंत शेतीसाठी पाणी मिळाले. त्यामुळे शेतकऱ्याना मोठा फायदा झाला म्हणून या वर्षी आपण निळवंडे पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याच्या सुचना कराव्यात व वरील गावातील सर्व बंधारे भरून देण्या बाबत आदेश करावेत, अशी विनंती केली आहे.


